Monday, July 20, 2020

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू

मार्च 2020 मध्ये राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यामुळे लागू झालेली आचारसंहिता आणि त्यानंतर कोविड-19 या महामारीमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया बंद झाली होती. काही महिन्यांच्या विसाव्यानंतर कर्जमुक्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 32.90 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती.

20 जुलै 2020 अखेर 27.38 लाख खातेदारांना 17 हजार 646 कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील 83 टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे.

महात्मा जोतिराव फुले  शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबविली जावी, जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 21 हजार 467 कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी 17 हजार 646 कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे.

योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये तसेच बँकांच्या शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यापैकी 2019-20 या आर्थिक वर्षात जवळजवळ 19 लाख खातेदारांना 11 हजार 993 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता तर 2020-21 या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 5 हजार 653 कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत निर्गमित केलेल्या यादीतील उर्वरित 5.52 लाख खातेदारांनी त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांना योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ मिळेल व त्यांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा होईल.

Saturday, July 18, 2020

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-गुजरात बॉर्डर सील करण्यात आले.

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-गुजरात बॉर्डर सील करण्यात आले. खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती आहे.

वेदांतामधून एक कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला, एका रुग्णावर गुन्हा दाखल झाला

दि. 17 जुलै: डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण दाखल होता. त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण वेदांतामध्ये उपचार न घेता तेथून पळून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. ह्या प्रकरणी वेदांतच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने कासा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा (क्र. 121/2020) दाखल केला आहे. त्याच्या पळून जाण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

तलासरी तालुक्यात 48 कोरोना रूग्ण बाधित व 1 रुग्णाचा मृत्यू

तलासरी तालुक्यात 48 कोरोना रूग्ण बाधित व 1 रुग्णाचा मृत्यू झाला.

पालघर जिल्ह्यात 24 तासांत 402 नवे रुग्ण – 211 कोरोना मृत्यू !


दि. 17 जुलै: पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मागील 6 दिवसांत 33 जणांनी आपले प्राण गमावले असून मृत्यूंची संख्या 211 झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक 184 मृत्यू वसई विरार महानगर क्षेत्रातील असून वसई ग्रामीण क्षेत्रात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुक्यात 3 मृत्यू वाढले असून संख्या 11 झाली आहे. जव्हार तालुक्यात 2 मृत्यू, वाडा तालुक्यात 2 मृत्यू ही संख्या कायम असून विक्रमगड तालुक्यात 1 कोरोना संसर्गामुळे 1 मृत्यू वाढून संख्या 2 झाली आहे.

जिल्ह्यामध्ये 6 दिवसांत 1731 कोरोनाग्रस्तांची भर पडली असली तरी, 986 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या मात्र 727 ने वाढली आहे. 12 जुलै रोजी 2514 जण रुग्णालयात दाखल होते. आज ही संख्या 3231 इतकी वाढली आहे.

पालघर जिल्ह्याच्या वसई तालुका वगळता उर्वरीत भागात, 6 दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या 242 ने वाढून 1604 झाली आहे. मृत्यूचा आकडा 4 ने वाढून 17 झाला आहे.

तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:-

पालघर तालुक्यात 6 दिवसांत 109 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 676 झाला आहे. त्यातील 489 जण बरे झाले असून 176 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 3 ने वाढून 11 झाली आहे.

वाडा तालुक्यात 6 दिवसांत 8 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 314 झाला आहे. त्यातील 252 जण बरे झाले असून 52 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 कायम राहिली आहे.

जव्हार तालुक्यात 6 दिवसांत 2 नवा रुग्ण आढळला असून एकूण आकडा 154 झाला आहे. त्यातील 146 जण बरे झाले असून 6 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 राहिली आहे.

विक्रमगड तालुक्यात 6 दिवसांत 5 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 124 झाला आहे. त्यातील 111 जण बरे झाले असून 11 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 ने वाढून 2 झाली आहे.

डहाणू तालुक्यात 6 दिवसांत 64 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 226 झाला आहे. त्यातील 135 जण बरे झाले असून 91 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. येथे मागील 24 तासांत नवे 27 रुग्ण निष्पन्न झाले.

मोखाडा तालुक्यात 6 दिवसांत नवा एकही रुग्ण आढळला नसून एकूण आकडा 30 कायम आहे. त्यातील सर्व जण बरे झाले आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.


तलासरी तालुक्यात 6 दिवसांत 55 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 80 झाला आहे. त्यातील 22 जण बरे झाले असून 58 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. येथे मागील 24 तासांत 48 रुग्ण निष्पन्न झाले.