Saturday, August 1, 2020

कसा भरायचा अकरावी ऑनलाइन अर्ज

अकरावी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यावर्षी ११ वी प्रवेशाचा रेजिस्ट्रेशन फॉर्म स्वतः मोबाईल/कॉम्पुटरवर ऑनलाइन भरायचा आहे. लॉकडाऊन असल्यामुळे कदाचित शाळांची मदत विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावर होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी काळजीपूर्वक ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

ऑनलाइन अर्ज कसा भराल:-


https://mumbai.11thadmission.org.in/Registration/Registration.aspx या लिंकवर क्लिक करावे.

सर्व प्रथम वरील लिंकवर क्लिक करा एक फॉर्म दिसेल.

1. एमएमआर रिजनमधील विद्यार्थ्यांनी Within MMR Area वर क्लिक करा. इतरांनी Outside MMR Area तर महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी Outside Maharashtra Area या पर्यायावर क्लिक करा.

2. Fresher वर क्लिक करा.

3. SSC वर क्लिक करा.

4.Seat No. बॉक्स मध्ये तुमचा स्वतःचा 10वी परीक्षा बैठक क्र.(Seat No.) लिहा.
उदा. A011025.

5. Seat No.च्या खाली लाल रंगातील Get SSC Data वर क्लिक करा.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे उद्घाटन

6. तुमचे पूर्ण नाव, आईचे नाव व इतर माहिती तुम्हाला दिसेल.

7. Mobile Number बॉक्स मध्ये तुमचा चालू असलेला मोबाईल नं. टाका.

8. Security Question पुढे Select ला क्लिक करा त्यातील एक प्रश्न निवडा, त्याच्या पुढच्या बॉक्स मध्ये त्या प्रश्नाचे उत्तर लिहा.

उदा. What is the name of your grandfather?
पुढच्या बॉक्स मध्ये तुमच्या आजोबांचे नाव लिहा.
(तुम्ही कोणताही प्रश्न निवडू शकता व त्याचे उत्तर लिहून तो प्रश्न व उत्तर लक्षात ठेवा)

9. तुमच्या 11वी ऍडमिशन फॉर्मचा पासवर्ड तुम्ही सेट करा पुढच्या बॉक्स मध्ये परत तोच पासवर्ड लिहा व लगेच ते वहीत लिहून घ्या व लक्षात ठेवा.

10. CAPCHA CODE बॉक्स मध्ये त्या बॉक्स खाली जे दिसते आहे सेम तसेच पाहून लिहा(टाईप करा)

11. वरील तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर परत एकदा चेक करून खालील हिरव्या Register बटन वर क्लिक करा.

पालघर वर्धापन दिन व १ ऑगस्ट महसुल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झालेला पालघर हा महाराष्ट्र राज्यातला ३६वा जिल्हा १ आॅगस्ट २०१४ रोजी अस्तित्वात आला..कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सहयाद्री पर्वताच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राची किनारपट्टी या दरम्यान पसरला आहे. 
पालघर वर्धापन दिन व १ ऑगस्ट महसुल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

Wednesday, July 29, 2020

२४ अभिनव स्टार्ट अप्स कल्पनांना मिळणार शासनाच्या विविध विभागातील कामे – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा


१०० उत्कृष्ट स्टार्ट अप्सची निवड जाहीर; कृषी, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, जल, कचरा व्यवस्थापनातील विविध कल्पक स्टार्टअप तरुणांकडून विकसित

तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत स्टार्टअप योजना राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातील १ हजार ६०० स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. त्यातील उत्कृष्ट १०० स्टार्टअप्सची घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली. तरुणांनी वैशिष्ट्यपूर्ण कल्पकता दाखवत कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, प्रशासन आदी विविध क्षेत्रात अभिनव बदल घडवू शकणारे स्टार्टअप सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले. या कल्पनांचा वापर शासनाच्या विविध विभागांमधील कामकाजासाठी करण्यात येणार आहे.

४ ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह

निवड झालेल्या १०० स्टार्टअप्सची माहिती www.msins.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२० दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात या स्टार्टअप्सचे सादरीकरण केले जाणार आहे. स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितींसमोर करण्याची संधी मिळणार आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सादरीकरणसत्रे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करुन त्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्यात येतील. त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी हे कार्यादेश देण्यात येतील, अशी घोषणाही मंत्री श्री. मलिक यांनी केली.  

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्य केले जाते. याअंतर्गत महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमात उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) मान्यताप्राप्त देशभरातील स्टार्टअप्स भाग घेऊ शकतात. आतापर्यंत झालेल्या दोन सप्ताहामधील विजेत्या स्टार्टअप्सनी राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना वापरुन काम केले आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

दहावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर बुधवार 29 जुलै 2020 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

मार्च 2020 मध्ये दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. सदर माहितीची प्रत / प्रिंट घेता येईल. www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.orgwww.maharashtraeducation.comwww.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या निकालाबाबत अन्य तपशील पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन http://verification.mh- ssc.ac.in स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी गुरुवार 30 जुलै 2020 ते शनिवार 8 ऑगस्ट 2020 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरुवार 30 जुलै 2020 ते मंगळवार 18 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट  कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीएल, नेटबँकिंगद्वारे भरता येईल.

मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च 2020 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.