Thursday, August 27, 2020

DYFI चे राज्यव्यापी बेरोजगार नोंदणी अभियान; मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे आवहान. 'ही' आहे मुख्य मागणी.

मुंबई : वाढती बेरोजगारी हे आव्हान बनले असताना सरकारने तरुणांना वाऱ्यावर सोडले असल्याचे म्हणत डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ( डीवायएफआय ) ने राज्यव्यापी बेरोजगार नोंदणी अभियान सुरू केल्याची माहिती 'डीवायएफआय'च्या राज्य महासचिव प्रिती शेखर यांनी महाराष्ट्र जनभूमी बोलताना सांगितले. 

कोरोना साथीच्या आजारापूर्वीही बेरोजगारी साथीच्या रोगाप्रमाणे वेगाने पसरत होती. आता तर बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नवीन रोजगार निर्माण होत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनीही तरुणांना वार्‍यावर सोडले आहे, असल्याचे डीवायएफआय ने म्हटले आहे.

सरकारने सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्रातील नोकरी भरती करावी, सर्व क्षेत्रातील रिक्त जागा जाहीर कराव्यात, ग्रामीण रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, नागरी रोजगार हमी योजना सुरू करावी, सर्व बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत बेकारी भत्ता म्हणून रुपये ५,००० मिळावेत, या मागण्या डीवायएफआयने केल्या आहेत

बेरोजगार आणि कंट्राटी नोकरीतील सर्व तरुणांना खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोंदणी करण्याचे आवहान केले आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScslkQnxxnIi27yLchtEfmsV_gw-EKMlR3k-G8biWZ0OyL8Gg/viewform

कोव्हीड 19 संदर्भात कुठल्याही मदतीसाठी 18001215532 टोल फ्री क्रमांक व covidbed.palghar.info ही लिंक


जिल्ह्यात कोव्हीड 19 ने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून ही गोष्ट चिंताजनक असल्याचे सांगून, मृत्यूदर कमी करण्यासाठी संशयित रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. आतापर्यंत मृत्यू पावलेल्या व्यक्तींपैकी 60% व्यक्ती इस्पितळात दाखल झाल्यानंतर 72 तासांच्या आत मृत्यू पावलेल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे. संशयित रुग्ण चाचणी करून घेण्यास पुढे येत नाहीत व गंभीर परिस्थिती उद्भवल्यानंतरच इस्पितळात दाखल होत असल्याने उपचार करण्यास पुरेसा कालावधी मिळत नाही अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आता दररोज पाचशे RTPCR आणि दोनशेहून अधिक अँटीजन टेस्ट आता करता येऊ शकणार आहेत.

रिव्हेरा, टिमा व पोशेरी या कोव्हीड रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन टॅन्क बसवण्यास परवानगी मिळाली असून ऑक्सिजन ची सुविधा लवकर उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यापासून डहाणू MRHRU लॅब मध्ये 200 मोफत चाचण्या करता येणार असून जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तरीही कोणाला काही मदत हवी असल्यास 18001215532 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. प्रत्येक तालुक्याअंतर्गत वॉर रूम स्थापीत करण्यात आल्या असून covidbed.palghar.info ह्या लिंकद्वारे कोव्हीड 19 चाचणी, बेड ची उपलब्धता, घरी विलगीकरण ह्या बाबींची माहिती मिळू शकणार आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोना वर मात करू या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

डहाणू तालुक्यात सरासरीच्या 97% पाऊस – मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 65% पाऊस

 दि. 26 ऑगस्ट: डहाणू तालुक्यात सरासरीच्या 96.9% इतका पाऊस पडला असून मोखाडा तालुक्यात मात्र सरासरीच्या अवघा 64.9% पाऊस पडला आहे. अन्य तालुक्यांची सरासरी पुढीलप्रमाणे: पालघर तालुका – 94.8%, तलासरी तालुका – 82.6%, वसई तालुका 79.9%, विक्रमगड तालुका 75%, वाडा तालुका 72.2, जव्हार तालुका 70.7%

बोईसरमध्ये 200 बेडचे कोव्हिड हेल्थ सेंटर उभे राहणार

जिल्हाधिकार्‍यांच्या संबंधितांना सुचना

पालघर, दि. 26 : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यांमधून बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक व्यवस्थापनाच्या मदतीने बोईसर व परिसरामध्ये 200 बेडचे डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर निर्माण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधितांना केली आहे. त्याचबरोबर पालघरमधील कांबळगाव येथील कोव्हिड केअर सेंटरचे मजबुतीकरण करणे व टिमा रुग्णालयातील संपूर्ण 40 बेड आयसीयूत रुपांतरीत करण्यात यावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

विषयास अनुसरून जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी काल, 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

वर नमुद सुविधा निर्माण करण्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औद्योगिक व्यवस्थापनाने या सुविधा निर्माण करावयाच्या असून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. त्याचबरोबर औद्योगिक व्यवस्थापनाकडे असणार्‍या अ‍ॅम्बुलन्स कोव्हिड रुग्णांच्या सेवेसाठी बोईसर येथे उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केल्या.

यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Sunday, August 23, 2020

डहाणू परिसरात दिवसभरात भूकंपाचे सहा सौम्य धक्के

परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज (रविवार)सकाळपासून भूकंपाचे सहा सौम्य धक्के बसल्याने पुन्हा येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आज सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी १.८ तीव्रतेचा, ११ वाजून ३९ मिनिटांनी ३.१ तीव्रतेचा, दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी  २.१ तीव्रतेचा, सायंकाळी ४ वाजून २२ मिनिटांनी १.८ तीव्रतेचा, सायंकाळी ५ वाजून ८  मिनिटांनी २.३ तर सायंकाळी ५ पाच वाजून २३ मिनिटांनी ३.२ तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला.

या सर्व भूकंपाचे केंद्रबिंदू डहाणू तालुक्याच्या परिसरात होते व केंद्रबिंदूची खोली पृष्ठभागापासून दहा किलोमीटर होती. तीन पेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप व डहाणू तालुक्यात अनेक ठिकाणी कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत असून, गेले काही महिने त्याची तीव्रता वाढण्याचे प्रकार कमी झाले होते. या भूकंपामुळे नुकसान झाल्या बद्दलची माहिती अजूनही प्राप्त झाली नाही.