Saturday, August 29, 2020

अंतिम वर्षांच्या परीक्षा होणारच : सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्ष वगळता परीक्षा रद्द करण्यात आल्या. तर, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशासह अन्य काही राज्यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचे देखील जाहीर केले होते. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग(UGC) ने या राज्यांच्या विसंगत नियमावली जाहीर केली. आता, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचे समर्थन केले असून आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत साथीच्या आजाराच्या दृष्टीने राज्यं परीक्षा पुढे ढकलू शकतात तसेच युजीसीच्या सोबत चर्चा करून तारीख ठरवू शकतात असा निकाल दिला आहे.

UGCने जाहीर केलेल्या नियमानुसार ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्रासह देशातील वाढती रुग्ण संख्या बघता विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून या परीक्षा घेणे शक्य नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती.

राज्याचे मंत्री व युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात UGC च्या या निर्देशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, यासह देशातील अन्य १३ राज्यांनी परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. मागील सुनावणीमध्ये राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला असून देशासह वाढत्या रुग्णसंख्येची सद्यस्थिती व धोका यादरम्यान मांडण्यात आला होता.

अखेर, आज सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांबाबत निर्णय जाहीर केला असून परीक्षा रद्द करता येणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. परीक्षा घेतल्याशिवाय या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करता येणार नसल्याचे कोर्टाने सांगितले. युजीसीने ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले होता, आता परीक्षा कधी घ्यायच्या हे निश्चित करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

Friday, August 28, 2020

महानिर्मिती तंत्रज्ञ-३ पदासाठी २ सप्टेंबरपासून मूळ कागदपत्रे तपासणी

उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे मूळ कागदपत्रे तपासणार

  • महानिर्मितीच्या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी तपशीलवार माहिती

  • उमेदवारांना नोंदणीकृत ई-मेल आणि एसएमएसद्वारे माहिती

नागपूर, दि. २७ : महानिर्मिती सरळसेवा जाहिरात क्र.०४/२०१९ अंतर्गत तंत्रज्ञ-३ या पदाच्या ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे रिक्त पदांची उपलब्ध संख्या, समांतर आणि सामाजिक आरक्षण विचारात घेवून कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून निवड झालेल्या उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे.

 

सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचा विचार करता, महानिर्मितीच्या मुंबई, पोफळी, पुणे, भुसावळ, चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी, नाशिक, पारस आणि परळी वीज केंद्राच्या संबंधित कार्यालयात २ सप्टेंबर २०२० पासून ह्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार आहे. उमेदवारांनी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर जाऊन आपली कागदपत्रे तपासणी नेमकी कोणत्या कार्यालयात, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळात होणार आहे याची खातरजमा करून घ्यावी. महानिर्मितीकडून उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आय.डी.वर तसेच एस.एम.एस.द्वारे ह्याबाबतची सूचना देखील  देण्यात आली आहे.  तंत्रज्ञ-३ पदाच्या सुमारे ७१६ उमेदवारांची कोविड-१९ नियमांचे पालन करून कागदपत्रे तपासणी करण्यात यावी असे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश आहेत.

 

कोविड काळात सर्वत्र आर्थिक संकट,आरोग्य समस्या, बेरोजगारीची समस्या असतांना महानिर्मिती कंपनी या माध्यमातून ७१६ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देत आहे ही निश्चितच अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बाब असल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

 

कागदपत्रे तपासणीकरिता उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरलेला अर्ज, त्यांची मूळ कागदपत्रे तसेच कागदपत्रांचा स्वसाक्षांकित (Self Attested) केलेला एक छायांकित संच (One Zerox copy set) कागदपत्रे पडताळणी अनुषंगाने जमा करणेकरिता स्वत:जवळ बाळगावा. तसेच आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे घेऊनच उमेदवाराने कागदपत्रे तपासणी करण्याकरिता त्यांच्या नावासमोर नमूद कार्यालयात, नेमून दिलेल्या दिवशी व वेळेवर उपस्थित रहावे. सोबत शारीरिक तथा वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे एम.बी.बी.एस. डॉक्टरकडून प्रमाणित केल्याचे मूळ फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.  कागदपत्रे जमा केल्यानंतर उमेदवारास संबंधित कार्यालयामार्फत पोच देण्यात येईल. नमूद दिनांक व वेळेत कागदपत्रे जमा करण्याकरीता उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही परिस्थितीत पुन्हा दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. उमेदवाराने अर्जात नमूद केलेली कागदपत्रे सादर न केल्यास, उमेदवाराची निवड ताबडतोब रद्द करण्यात येईल.

 

तंत्रज्ञ-३ या पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीअंती पात्र/अपात्र उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या www.mahagenco.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे महानिर्मितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


Thursday, August 27, 2020

DYFI चे राज्यव्यापी बेरोजगार नोंदणी अभियान; मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे आवहान. 'ही' आहे मुख्य मागणी.

मुंबई : वाढती बेरोजगारी हे आव्हान बनले असताना सरकारने तरुणांना वाऱ्यावर सोडले असल्याचे म्हणत डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ( डीवायएफआय ) ने राज्यव्यापी बेरोजगार नोंदणी अभियान सुरू केल्याची माहिती 'डीवायएफआय'च्या राज्य महासचिव प्रिती शेखर यांनी महाराष्ट्र जनभूमी बोलताना सांगितले. 

कोरोना साथीच्या आजारापूर्वीही बेरोजगारी साथीच्या रोगाप्रमाणे वेगाने पसरत होती. आता तर बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नवीन रोजगार निर्माण होत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनीही तरुणांना वार्‍यावर सोडले आहे, असल्याचे डीवायएफआय ने म्हटले आहे.

सरकारने सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्रातील नोकरी भरती करावी, सर्व क्षेत्रातील रिक्त जागा जाहीर कराव्यात, ग्रामीण रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, नागरी रोजगार हमी योजना सुरू करावी, सर्व बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत बेकारी भत्ता म्हणून रुपये ५,००० मिळावेत, या मागण्या डीवायएफआयने केल्या आहेत

बेरोजगार आणि कंट्राटी नोकरीतील सर्व तरुणांना खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोंदणी करण्याचे आवहान केले आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScslkQnxxnIi27yLchtEfmsV_gw-EKMlR3k-G8biWZ0OyL8Gg/viewform

कोव्हीड 19 संदर्भात कुठल्याही मदतीसाठी 18001215532 टोल फ्री क्रमांक व covidbed.palghar.info ही लिंक


जिल्ह्यात कोव्हीड 19 ने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून ही गोष्ट चिंताजनक असल्याचे सांगून, मृत्यूदर कमी करण्यासाठी संशयित रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. आतापर्यंत मृत्यू पावलेल्या व्यक्तींपैकी 60% व्यक्ती इस्पितळात दाखल झाल्यानंतर 72 तासांच्या आत मृत्यू पावलेल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे. संशयित रुग्ण चाचणी करून घेण्यास पुढे येत नाहीत व गंभीर परिस्थिती उद्भवल्यानंतरच इस्पितळात दाखल होत असल्याने उपचार करण्यास पुरेसा कालावधी मिळत नाही अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आता दररोज पाचशे RTPCR आणि दोनशेहून अधिक अँटीजन टेस्ट आता करता येऊ शकणार आहेत.

रिव्हेरा, टिमा व पोशेरी या कोव्हीड रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन टॅन्क बसवण्यास परवानगी मिळाली असून ऑक्सिजन ची सुविधा लवकर उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यापासून डहाणू MRHRU लॅब मध्ये 200 मोफत चाचण्या करता येणार असून जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तरीही कोणाला काही मदत हवी असल्यास 18001215532 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. प्रत्येक तालुक्याअंतर्गत वॉर रूम स्थापीत करण्यात आल्या असून covidbed.palghar.info ह्या लिंकद्वारे कोव्हीड 19 चाचणी, बेड ची उपलब्धता, घरी विलगीकरण ह्या बाबींची माहिती मिळू शकणार आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोना वर मात करू या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

डहाणू तालुक्यात सरासरीच्या 97% पाऊस – मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 65% पाऊस

 दि. 26 ऑगस्ट: डहाणू तालुक्यात सरासरीच्या 96.9% इतका पाऊस पडला असून मोखाडा तालुक्यात मात्र सरासरीच्या अवघा 64.9% पाऊस पडला आहे. अन्य तालुक्यांची सरासरी पुढीलप्रमाणे: पालघर तालुका – 94.8%, तलासरी तालुका – 82.6%, वसई तालुका 79.9%, विक्रमगड तालुका 75%, वाडा तालुका 72.2, जव्हार तालुका 70.7%