Saturday, October 31, 2020

व्हाट्सअप स्टेटस ठेऊन 500 रुपये कमवण्याच्या नादात असाल तर हे वाचाच

मागील काही दिवसांपासून व्हॉटस्अॅप स्टेट्सवर एक लिंक मोठ्या प्रमाणावर अपडेट होत आहे. त्यात व्हॉटस्अॅपवर स्टेट्स ठेवून पैसे कमविण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. त्यासाठी व्यक्तिगत काही माहिती या लिंकव्दारे भरून घेतली जात आहे. विशेष म्हणजे अनेक जणांनी या लिंकवर माहिती भरून व्हॉटस्अॅप स्टेट्स ठेवल्याचे प्रकार हि समोर आले आहेत. मात्र, या बाबत सायबर सेल मात्र अनभिज्ञ आहे असल्याचे हि दिसून आले आहे.


बेरोजगारी आणि शॉटकटने पैसे कमविण्याच्या नादात नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवले जाते त्यांना अनेक जण त्याला बळी पडतात त्यातच अनेकांची लूट होते. 


हल्ली प्रत्येक जण आपल्या मोबाइलवरून ऑनलाइन पेमेंट ट्रांसफर करण्यासाठी बॅंक लिंक असलेल्या मोबाइल नंबरशी विविध अॅपची जोडणी करतात. तसेच तोच नंबर नियमित वापरात असल्याने त्यावर व्हॉटस्अॅप ही सुरू करतात. यातून आपली व्हाट्सअप सह आपली वैयक्तिक माहिती लीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


काय आहे या लिंक मध्ये- 


"मराठी ऑनलाईन वर्क" या नावाने हि बनावट वेब साईट आहे. ही लिंक ओपन केल्यानंतर व्हॉटस्अॅप स्टेटसमधून पैसे कमवू शकता अशी जाहीरात देत स्वतःची व्यक्तिगत माहिती भरण्यासाठी सांगितले जाते. या लिंकमध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत. स्वतःचा मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी भरल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करण्यास सांगितले जाते. त्यानंतर व्हॉटस्अॅप स्टेटस शेअर करण्यासाठी एक आयकॉन येतो. शेअर केलेले स्टेटस जर तीस पेक्षा अधिक जणांनी पाहिले तर ५०० रुपयांपर्यंत कमाई करता येईल असे त्या लिंकवर नमूद केले आहे. या प्रलोभनाला आतापर्यंत हजारो जण बळी पडले आहेत. त्यामुळे हा सायबर क्राईमाची नवी पद्धती तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, या संदर्भात सायबर सेलच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लिंकवर व्यक्तिगत माहिती भरताना खात्री करा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे.


या बाबतील सत्य जाणून घेण्यासाठी "महाराष्ट्र जनभूमी"ने कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, अशा कोणत्याही गोष्टीवर कुणी विश्वास ठेऊ नये या भूलथापा असतात, अशा पद्धतीने कुणालाही पैसे मिळणार नाही. यातून तुमची बदनामी तसेच तुम्हाला ब्लॅकमिल केले जाऊ शकते. या माहिती वरून तुमच्या नावाने कर्ज काढले जाऊ शकते किंवा तुमचे बँक खाते हॅक केले जाऊ शकते यासाठी त्या माहितीचा वापर केला जाऊ शकतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती कुठेही देऊ नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

Saturday, October 24, 2020

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना




|अनुसूचित जमाती   व अनुसूचित जाति प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना|

(1) नवीन विहीर खोदकाम
(2) जुनी विहीर दुरुस्ती 
(3) ठिबक सिंचन संच 
(4) तुषार सिंचन संच
(5) पंप संच 
(6) विज जोडणी आकार
(7) पाईप लाईन

आवश्यक कागदपत्रे:-

1)७/१२
2)८ अ,
3)बॅक पासबुक,
4)आधारकार्ड,
5)फोटो
6)जात प्रमाणपत्र
7) रू. 1.50 लाख पर्यंत उत्पन्न प्रमाणपत्र-तहसिलदार यांचे स्वाक्षरीसह
8) ग्रामपंचायत चा ठराव
9) सातबारा वर ऐका पेक्षा जास्त नाव असल्यास संमती पत्र 100 स्टॅम्प पेपरवर
10) सोबत मोबाईल- OTP साठी

लाभार्थी अर्ज खालील वेबसाईटवर online करावेत.

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

संपर्क:-
  
कृषि अधिकारी
पंचायत समिती

Tuesday, October 20, 2020

सणासुदीला गाडी घेण्याचे स्वप्न करा पुर्ण; केवळ ७९९ रुपयांच्या EMI मध्ये मिळतेय टाटाची गाडी


tata motors offers
टाटा मोटर्सची खास ऑफर
दसरा-दिवाळीच्या मुहुर्तावर जर तुम्हाला स्वतःची गाडी घ्यायची असेल तर टाटा मोटर्सने तुमच्यासाठी अफलातून ऑफर आणली आहे. तसं सणासुदीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणत असतात. टाटा मोटर्सनेही विक्री वाढविण्यासाठी HDFC बँकेसोबत एक करार करुन ग्राहकांना आर्थिक साहाय्य करण्याची योजना आणली आहे. यामुळे केवळ ७९९ रुपयांचा हप्ता देऊन तुम्हाला गाडी विकत घेता येणार आहे. Gradual Step Up Scheme आणि TML Flexi Drive Scheme या दोन योजनांच्या माध्यमातून विक्री वाढविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२० पर्यंत या योजना उपलब्ध आहेत.

टाटा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार BS6 रेंज, SUV आणि इलेक्ट्रिक गाड्यांवर या योजना लागू आहेत. Gradual Step Up Scheme या योजनेतंर्गत ७९९ रुपयांचा मासिक हप्ता असणार आहे. अर्थात ग्राहक कोणती गाडी निवडतात, त्यानुसार देखील ईएमआयची रक्कम कमी-जास्त होऊ शकते. ग्राहकांच्या क्षमतेनुसार दोन वर्षांत हळुहळु ईएमआय वाढविला जाईल.

तर TML Flexi Drive Scheme या योजनेतंर्गत ग्राहकांना वर्षातील तीन महिने निवडण्याचा पर्याय असेल, ज्यामध्ये केवळ ७८९ रुपयांचा मासिक ईएमआय भरता येणार आहे. पहिल्या योजनेसारखेच गाडीच्या प्रकारावर याची रक्कम अवलंबून असेल. या दोन्ही योजनांसोबतच टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या एक्स शोरुमसाठी १०० टक्के फायनान्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वतःच्या गाडीचे स्वप्न पुर्ण करा

टाटा मोटर्सचे मार्केटिंग विभागाचे प्रमुख विवेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, टाटाच्या या दोन योजना ग्राहकांना स्वतःची गाडी घेण्याचे स्वप्न करण्यासाठी आहेत. दोन्ही योजना ईएमआय भरण्यासाठी सुट देणाऱ्या आहेत. तर एचडीएफसी बँकेचे रिटेल प्रमुख अरविंद कपिल म्हणाले की, टाटासोबत आम्ही भागीदारी केल्यामुळे ग्राहकांना याचा चांगलाच फायदा मिळेल

Saturday, October 17, 2020

शेतकऱ्यांनो..मोबाईलद्वारे अर्ज भरून पीकविम्याचा मिळवा लाभ..!


राज्यातील खरीप हंगाम आता काढणीच्या टप्प्यात असताना सतत होणाऱ्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पिकांची मोठी हानी होत आहे. कोणत्याही पिकाची काढणी पश्चात पावसामुळे हानी होत असल्यास पंतप्रधान पीक वीमा योजनेतून भरपाई मिळते.  

राज्यातील खरीप हंगाम आता काढणीच्या टप्प्यात असताना सतत होणाऱ्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पिकांची मोठी हानी होत आहे. काढणी करून शिवारात ठेवलेल्या सोयाबीन, कापूस किंवा इतर कोणत्याही पिकाची काढणी पश्चात पावसामुळे हानी होत असल्यास पंतप्रधान पीक वीमा योजनेतून भरपाई मिळते.  त्यासाठी शेतकऱ्यांना घरबसल्या केवळ मोबाईलमधून अर्ज दाखल करता येतो. विमा योजनेच्या अॅप्लिकेशनद्वारे पीक नुकसानीची माहिती कळवता येते व नुकसान भरपाईसाठी दावा करता येतो. याबाबत वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांना मोलाच्या  टीप्स दिलेल्या आहेत...

पीक वीमा कोणत्या बाबीसाठी मिळतो..

  •  शेतात काढून ठेवलेल्या, वाळत घातलेल्या पिकाचे पावसाने नुकसान झाल्यास ७२ तासात माहिती (इंटिमेशन) दिल्यास वीमा भरपाई मिळते.-इंटिमेशन हे मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे किंवा टोल फ्री नंबरवर देखील देता येते.
  • इंटिमेशन जर मोबाईल अप्लिकेशनद्वारे दिले तर शेवटी डॉकेट आयडी मिळेपर्यंत सर्व ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बिनचूकपणे पार पाडावी लागेल.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी काय कराल...

  • गुगल मोबाईल प्ले स्टोअरवर जा. तेथे सर्च ऑप्शनमध्ये Crop loss असे टाईप करा. Install शब्दावर क्लिक करा. दाबा. त्यानंतर ३.५८ एमबीचे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड होईल.
  • Crop Insurance नावाचे अॅप डाऊनलोड झाल्यावर Open शब्दावर क्लिक दाबा. त्यानंतर इंग्रजीमध्ये Pradhan Mantri Fasal Bima Yojana असे पान उघडते.
  • या पानावर सर्वात खाली Change language शब्दांवर क्लिक करा. त्यानंतर तीन पर्याय येतील. सर्वात खाली मराठी पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर खाली Apply शब्दावर क्लिक करा व Ok क्लिक करा.
  • त्यानंतर अॅपवर पुन्हा Open क्लिक करा. त्यानंतर आपणाला मराठीमध्ये सर्व पर्याय दिसतील. त्यापैकी ‘नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा’ या पर्यायावर क्लिक करा.
  •  पीक नुकसान’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर दोन पर्याय येतील. त्यापैकी ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ यावर क्लिक करा.
  •  त्यानंतर मोबाईल क्रमांकाची पडताळणी होते. त्यासाठी दिलेल्या बॉक्समध्ये आपला मोबाईल क्रमांकाची नोंद करा. त्यानंतर ‘ओटीपी पाठवा’ यावर क्लिक करा.
  • ओटीपी नंबरसाठी थोडा वेळ थांबताच ऑटो फिल कोड येतो. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर हंगाम येतात. त्यापैकी ‘खरीप’वर क्लिक करा.  त्यानंतर वर्ष येत असून ‘२०२०’ या संख्येवर क्लिक करा. त्यानंतर योजना असा पर्याय येतो. त्यात Pradhan Mantri Fasal Bima Yojana क्लिक करा. त्यानंतर राज्य यादी येते. त्यात Maharashtra क्लिक करा. त्यानंतर शेवटी ‘निवडा’ या शब्दावर क्लिक करावे.
  • यानंतर अर्जाचा स्रोत असे पान येते. त्यात Bank, CSC, Farmers online, Intermediary असे शब्द येतात. अशावेळी आपण यापूर्वीचा विमा अर्ज कुठे भरला होता. त्यानंतर शब्दावर क्लिक करावे. समजा सेवा केंद्रावर असल्यास CSC वर क्लिक करावे.
  • CSC वर क्लिक करताच अर्ज व पॉलिसी क्रमांक द्यावा. पीकविमा नोंदविल्यानंतर प्रत्येकाला पॉलिसी क्रमांक मिळतोच. तोच याठिकाणी अचूक भरावा. तो पुन्हा खात्री करून नंतर ‘यशस्वी’वर क्लिक करावे.
  • यानंतर यादीतून अर्जाची निवड करा, अशी ओळ येते. त्याखाली इतर पर्याय निवडा अशी ओळ असून त्यावर क्लिक केल्यावर आपल्या पॉलिसी क्रमांकावरील नाव, जिल्हा, खाते क्रमांक,विमा हप्ता अशी माहिती तेथे दिसते. यानंतर खाली ‘पिकाचे नाव’ यावर क्लिक करावे.
  • त्यानंतर लोकेशन मागितले जाते. त्यासाठी Ok वर क्लिक करा. यानंतर घटनेचा प्रकार असा शब्द आहे. त्यावर Select केल्यानंतर Animal Infestation, Cloud Burst, Cyclone, Cyclonic Rains, Diseases, Drought,  Extra Rainfall असे पर्याय येतात.
  • वरील पर्यायांपैकी आपल्याला काढणीपश्चात पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी दावा करायचा आहे. त्यामुळे Cyclonic Rains या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर घटनेचा दिनांक टाकावा. पाऊस पडून नुकसान केव्हा झाले ती तारीख नोंदवावी. समजा ११ तारीख असेल तर ११ वर क्लिक करून ‘ठिक आहे’ या शब्दावर क्लिक करावे. त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा अशी ओळ आहे. त्याखाली बॉक्समध्ये Select क्लिक करा. तेथे Standing Crop, Harvested, Cut And Spread Bundled condition for drying असे पर्याय येतात. त्यापैकी सोयाबीन समजा कापून ठेवलेले असेल तर Cut and Spread वर क्लिक करावे
  • यानंतर त्याच पानावर नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी असा बॉक्स येतो. तेथे झालेल्या नुकसानीची अंदाजे टक्केवारी द्यावी. उदा. ८०, ९०, १०० असे. त्यानंतर शेरा असा एक बॉक्स आहे. तेथे  टक्केवारीचा आकडा टाकून लॉस असे इंग्रजीत लिहावे. उदा. ८० loss
  • यानंतर फोटो अपलोड असा बॉक्स येतो. तेथे आपल्या शेताचा फोटो अपलोड करण्यासाठी आधी परवानी द्यावी लागेल. त्यावेळी Allow Crop Insurance to take photo and record Vidio अशी ओळ येईल. त्याखाली Allow शब्दावर क्लिक करावे. फोटो काढावा व खाली बरोबरचे चिन्ह असेल त्यावर क्लिक करावे. त्यानंतर व्हिडिओ अपलोड करा, असा बॉक्स आहे. तेथे एक मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करावा. त्यासाठी व्हिडिओ काढण्याकरिता लाल वर्तुळावर क्लिक करावे. पुन्हा बरोबर चिन्हावर क्लिक केल्यावर व्हिडिओ अपलोड होतो.
  • ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यावर सादर करा या शब्दावर क्लिक करावे. त्यानंतर ऑनलाइन अप्लिकेशनवर अर्ज अपलोड होतो. शेवटी Crop loss Reported Successfully अशी ओळ येते व त्याखाली डॉकेट आयडी येतो. तोच आयडी क्रमांक अतिशय महत्त्वाचा आहे. तो लिहून ठेवा अथवा त्याचा स्क्रिनशॉट घेऊन ठेवा. याच आयडीच्या माध्यमातून आपल्याला अर्जाची स्थिती देखील कळते.

जोखीम कार्यपध्दतीच्या शंकांबाबत कृषी आयुक्तालय काय म्हणते ?
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Localized Calamities) व नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान (Post Harvest Losses )  या दोन्ही बाबींकरीता  प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. काही जिल्ह्यांमध्ये पीक काढणीनंतर ऑक्टोबरमधील पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंचनामे महत्त्वाचे ठरतात, असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे.

वैयक्तिक पंचनाम्यासाठी अट काय आहे?
 “हंगाम कालावधीत अधिसूचित क्षेत्रातील शेतात पीक कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवला असल्यास फक्त अधिसूचित पिकांसाठीच आणि तो देखील कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवडयांपर्यंन्त (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस किंवा अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे,” असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे. तसेच, काढणीपश्चात नुकसान जोखीम अंतर्गत नुकसान भरपाईचे काही निकष आहेत. ते कोणते हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 भरपाई कोणत्या खर्चाच्या प्रमाणात मिळते ?
अधिसूचित विमा क्षेत्रात अधिसूचित पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला व पूर्वसूचना (इंटिमेशन) दिलेल्या शेतकऱ्यांसाठी भरपाईची तरतूद वैयक्तिक स्तरावर लागू राहील, असे आयुक्तालय म्हणते. असे कमाल दायित्व हे अधिसूचित पिकाच्या बाधित क्षेत्राच्या विमा संरक्षित रक्कमे एवढे राहील.तसेच,जोखमीचा धोका घडेपर्यंत पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठा खर्चाच्या प्रमाणात नुकसान भरपाई ही विमा संरक्षित रकमेच्या अधीन राहील, अशी अट आहे.

 माहिती कळविण्याच्या पद्धती कशी आहे?
शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत याबाबतची पूर्वसूचना Crop Insurance App अथवा टोल फ्री क्रमांकाद्वारे विमा कंपनीस किंवा संबंधित बँकेला व कृषी विभागाला दिली पाहिजे. सर्वप्रथम प्राधान्याने Crop Insurance App या मोबाईलॲपद्वारे पूर्वसूचना देण्यात यावी. ॲपद्वारे शक्य न झाल्यास विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर सूचना देण्यात यावी. याशिवाय बँक किंवा कृषी विभागास माहिती द्यावी. ही माहिती संबंधित बँक किंवा कृषी विभागाकडून संबंधित विमा कंपनीला ४८ तासात पाठवण्यात येते. इतर नोंदणी स्त्रोतांकडून देखील पूर्वसूचना येतात. त्याची नोंद संबंधित कार्यालयाने अथवा विमा कंपनीने राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

भरपाईसाठी कोणती कागदपत्रे द्यावी लागतात?
नुकसान भरपाईबाबत पूर्वसूचना मोबाईल ॲपद्वारे कळविली नसल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा लागतो. त्यासाठी अर्ज असतो. विहित नमुन्यातील अर्ज देताना त्यासोबत काही आवश्यक कागदपत्रांसह माहिती द्यावी लागते. त्यात शेतकऱ्याचे नाव, बाधित सर्व्हे नंबर,  पीकनिहाय बाधित क्षेत्र, पोर्टलवरील शेतकरी अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर, कर्जदार शेतकरी असल्यास केसीसी खातेदार क्रमांक,बिगर कर्जदार शेतकरी असल्यास बॅंकेचा बचत खाते क्रमांक,वीमा हप्ता भरल्याचा पुरावा द्यावा लागतो.  वीमा कंपनीस विहित कालावधीत सादर करणे आवश्यक, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.

माहिती किती दिवसात सादर करावी लागते?
काही वेळा शेतकरी परिपूर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू शकत नाही. अशा वेळी हाती असेल त्या माहितीच्या आधारे अर्ज सादर करता येतो. पण अशा वेळी उर्वरित माहिती किंवा अत्यावश्यक कागदपत्रे सात दिवसांच्या आत वीमा कंपनीला द्यावी लागतात. पीक नुकसानीचा पुरावा म्हणून Crop Insurance App या मोबाईलॲपद्वारे नुकसानग्रस्त क्षेत्राचे छायाचित्र वीमा कंपनीस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्थात, त्यानंतर पीक नुकसानीचे सर्वेक्षण होते. त्यासाठी संयुक्त समिती आहे. या समितीत वीमा कंपनीचा पर्यवेक्षक,शासन प्रतिनिधी आणि संबंधितशेतकरी यांचा समावेश असतो, असा निर्वाळा आयुक्तालयाने दिला आहे.

सर्व शेतकरी भरपाईस केव्हा पात्र होतात?

  • संयुक्त समितीने योग्य प्रमाणात केलेल्या नमुना सर्वेक्षणाच्या आधारे वीमा कंपनीमार्फत नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येते.काढणीपश्चात जोखिमकरीता जर बाधित क्षेत्र हे अधिसूचित वीमा क्षेत्राच्या २५ टक्क्यांपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर २५ टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसूचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी (विमा योजनेत सहभागी झालेले व पिकाचे नुकसान वेळेत पूर्वसूचना दिलेले) नुकसानभरपाईस पात्र होतील, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
  • वीमा कंपन्यांमार्फत सर्वेक्षणासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, शेतकऱ्यांसाठी काढणी पश्चात जोखीम अंतर्गत सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व सर्व संबंधित विमा कंपन्यांना विशेष सूचना दिल्या आहेत, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

विमा कंपन्यांशी कुठे संपर्क साधाल?
विमा कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक आहेत. मात्र, त्या जिल्ह्यात कोणती कंपनी आहे हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तातडीने संपर्क करणे आवश्यक आहे.

जिल्हे व त्यासाठी नियुक्त केलेली विमा कंपनी आणि त्यांचे कंसात दिलेले टोल फ्री क्रमांक असे
अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा यासाठी भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००१०३७७१२), परभणी, वर्धा, नागपूर, वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, जालना, गोंदिया, कोल्हापूरसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००१०२४०८८), नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००१०३५४९०), औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला,धुळे, पुणे जिल्ह्यासाठी एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी (१८००२६६०७००), उस्मानाबाद बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००२०९५९५९) तर लातूर व बीडसाठी भारतीय कृषी विमा कंपनीशी (१८००४१९५००४ संपर्क साधावा लागेल.

पीक काढून शेतात वाळवण्यासाठी ठेवले असल्यास व १५ दिवसाच्या आत पाऊस झाल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीपासून ७२ तासाच्या आत इंटिमेशन द्यावे. त्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन वापरता येईल. टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येईल. बॅंकेकडे देखील अर्ज देता येईल. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा. त्यात काहीही अडचण आल्यास कृषी कार्यालयांची मदत घ्यावी.
— धीरज कुमार, कृषी आयुक्त

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मोबाईल अॅप्लिकेशन वापरावे. मात्र, कनेक्टिव्हिटीची अडचण असल्यास गाव पातळीवर कृषी सहायकाकडे ऑफलाइन अर्ज द्या. आम्ही कृषी सहायकांना त्यांच्या मुख्यालयात थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. बॅंकेत किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात देखील ऑफलाइन अर्ज देता येतो.
— शंकर तोटावार, (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम)

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढून ठेवलेल्या पिकांचे म्हणजे काढणी व मळणीच्या कामात पाऊस झाल्याने नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हवी असल्यास ७२ तासांच्या आत मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे किंवा विमा कंपनीला टोल फ्री क्रमांकावर अथवा कंपनीच्या ई-मेलवर ‘इंटिमेशन’ द्यावे. काही अडचण आल्यास कृषी सहायकांच्या माध्यमातून अडचणींचे निराकरण करावे. 
— ऋषिकेश मोडक, (जिल्हाधिकारी, वाशीम)

Friday, October 16, 2020

पालघर जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन वेबिनार; लाभ घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन


 दि. 16 : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकरिता शासनाच्या विविध कर्ज योजना व सवलतींबाबत विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आपल्या योजनेची माहिती ऑनलाईन वेबिनारद्वारे देणार आहेत. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध कर्ज योजनांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता हा वेबिनार आयोजित करण्यात आला असुन जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, आयटीआय, तसेच इतर शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी आपल्या आजी-माजी विद्यार्थ्यांना या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा पालघर जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष यांनी केले आहे.