Thursday, June 3, 2021

जिल्ह्यातील सलुनचालकांना धक्का; दुकान सुरु ठेवण्याची परवानगी रद्द!


पालघर जिल्हाधिकार्‍यांनी काल, 31 मे रोजी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा नसलेली काही दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेदरम्यान उघडण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र राज्य शासनाच्या आदेशात सलुन, स्पा व जिम पुर्णपणे बंद ठेवण्याचे नमुद असल्याने पालघर जिल्ह्यातील सलुन उघडण्यास दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज याबाबतचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असुन 31 मे रोजीचे सलुन (केश कर्तनालय व दाढी करणे) सुरु ठेवण्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे.

Sunday, May 2, 2021

कोविड-19 विशेष मुख्यमंत्री सहायता निधी


कोविड-19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कोविड-19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे

इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

 

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

आद्यक्रांतिवीर शहीद राघोजी भांगरे यांचा जीवन प्रवास

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावले. अनेकांच्या छोट्या मोठ्या लढाया यावेळी महत्त्वाच्या होत्या. इतिहासाने त्याची दखल घेतली असली तरी अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली गेली नाही. ते समाजापर्यंत पोहोचलेच नाही. आदिवासी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची दखल इतिहासाला घ्यावी लागली. परंतु अजूनही ते जनसमाजात पोहोचलेले नाहीत.
राघोजी भांगरेंचा जन्म ८ नोव्हेंबर १८०५ रोजी देवगाव येथे आदिवासी महादेव कोळी जमातीतील आई रमाबाई व वडील रामजी यांच्या पोटी जन्म झाला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने नटलेले देवगाव हे छोटेसे खेडे होते. वडील रामजी ब्रिटिश सरकारच्या दरबारी सुभेदार म्हणून नोकरी करत होते. परंतु इ. स. १८१८ साली ब्रिटिशांनी मराठा सैन्यास हरवल्यानंतर महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्यांच्या शिलेदाऱ्या, वतनदाऱ्या काढल्या. परंपरागत अधिकार काढल्याने इंग्रजांविरुद्ध महादेव कोळ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.
कोकणात एक दरोडा पडला होता, या दरोड्याचा आरोप राघोजीचे वडील बंडखोर असल्यामुळे त्यांच्यावर करण्यात आला. राघोजींच्या घरच्यांचा पोलिसांनी मोठा छळ केला. राजूर प्रांताचा पोलिस अधिकारी अमृतराव कुलकर्णी यांची भेट घेऊन छळ थांबविण्यासंदर्भात दोघांमध्ये बोलणे चालू असताना बाचाबाचीत अनर्थ झाला. धिप्पाड राघोजीने मुंडकं तोडून एका कोपऱ्यात ठेवले. धिप्पाड राघोजीला अडविण्यास कोणी धाजवले नाही. १८२६ चे ते साल त्यांनी आपल्या सुखी जीवनावर तुळशीपत्र ठेवले. राघोजी भांगरे आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाने क्रांतीची मशाल अधिक तेजस्वी होऊ लागली. १८२७ साली हिवाळ्या घाटाच्या दरीमध्ये प्रचंड काळोखात एक सभा घेतली. येथील सभेत देवजी आव्हाड सहाय्यक सल्लागार, तर राया ठाकर राघोजींचा अंगरक्षक बनला. मायभूमीला मुक्त करण्याची शपथ यावेळी घेतली गेली. राघोजींच्या टोळ्यांनी गोऱ्यांना सळो की पळो करून सोडले.
इ. स. १८२८ ला शेतसारा वाढविण्यात आला. सारावसुलीमुळे गोर गरीबांना पैशाची गरज भासू लागली. त्यामुळे गोरगरीब सावकर-वाण्याकडून भरमसाठ कर्ज घेऊ लागले. त्यामुळे कर्जाच्या बदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. राघोजीने सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंड तीव्र केले. इंग्रज सत्तेच्या विरोधात नगर, पुणे, नाशिक, ठाणे या भागात बंडकऱ्यांच्या टोळ्या उभ्या केल्या.
इ. स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरूंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटले होते. परंतु ते प्रत्यक्षात आले नाही. इंग्रजांंविरोधातील असंतोष वाढत होता. भिल्ल जमातीच्या टोळ्या उभ्या राहिल्या, राघोजीना त्यांची साथ मिळाली. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजार रूपये बक्षीस जाहीर केले. इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्यांने बंड उभारले. कॅप्टन मँकिंटॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घखट, रस्ते, जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळविली परंतु बंडखोर वरमले नाहीत. बंड तीव्र झाले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली, मार्ग रोखून धरले. ८० जणांना कैद केले. दहशतीमुळे लोक उलटले. फितुरीमुळे राघोजीचा खंबीर साथीदार बापूजी भांगरे मारला गेला.
साताऱ्याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते, त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणाऱ्या सावकारांना धडा शिकवणे या हेतूने राघोजी खंडणी वसूल करीत असे. १८४४ साली साताराचे राजे प्रतापसिंह छत्रपति यांची भेट झाल्याची अभ्यासकांचे मत आहे.
नोव्हेंबर इ. स. १८४४ ते मार्च इ. स. १८४६ या काळात राघोजींचे बंड शिगेला पोहोचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने ‘आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रजांचे वैरी आहोत’, अशी भूमिका जाहीर केली होती. कुटुंबातील समाजातील स्रियांबद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य, प्रामाणिकपणा व नितिमत्ता याला त्याने उच्चतम मानले. इ.स. १८४५ ला जुन्नरचा उठाव ठरला. कॅप्टन मँकिंटॉशने २० हजाराची फौज घेऊन वेढा टाकला. यावेळी मोठी हार पत्कारावी लागली. भागोजी नाईक, खंडू साबळे आदी निष्ठावंत साथीदार धारातीर्थी पडले. राघोजी तुरी देऊन निसटला. राघोजीला कोणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागला. पंढरपूर येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासींना पुन्हा जमा करून बंड करण्याच्या तयारीत असणाऱ्या राघोजीला इंग्रजांनी पकडले व ठाण्यास नेले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना वकील मिळू दिला नाही. त्याने कोर्टात स्वतः च बाजू मांडली. २ मे १८४८ रोजी ठाणे सेंंट्रल जेल येथे राघोजी भांगरेंना फाशी देण्यात आली. परंतु राघोजींचे स्मरण करण्यासाठी २ मे २०१४ उजाडावे लागले. यादिवशी १६६ व्या स्मृतीदिनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे सेंट्रल जेल व जिल्हाधिकारी कार्यालाजवळील मुख्य चौकास आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे असे नावे देण्यात आले.

Saturday, May 1, 2021

शाळांना सुट्ट्या; पुढील शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होणार


राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शनिवार दि. १ मे, २०२१ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून या सुट्टीचा कालावधी दि.१३ जून, २०२१ पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे.

पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार दि. १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात येतील, तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार दि. २८ जून, २०२१ रोजी शाळा सुरू होतील. या संदर्भात शिक्षण संचालकांनी नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय-अशासकीय, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या आहेत.

शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.

माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोविड-१९ च्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील ते यथावकाश संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येतील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

वसई-विरार मध्ये प्रत्येक दुसरी व्यक्ती कोविड बाधित ?

वसई-विरारमध्ये प्रत्येक दुसरी व्यक्ती कोविड बाधित असल्याचे आढळत आहे. कोविड चाचण्या होणाऱ्यांपैकी निम्म्या व्यक्तींना कोविडची बाधा असल्याचे आढळत आहे, तर या महानगर पालिकेच्या हद्दीत मुंबई महानगर पालिकेच्या तुलनेने अवघ्या तीन टक्क्यांच्या आसपास चाचण्या होत आहेत. महामुंबईतील उल्हास नगर महानगर पालिकेकडून सर्वात कमी कोविड चाचण्या होत आहेत. मुंबईच्या अवघ्या दोन टक्के चाचण्या या महानगर पालिकेत होत आहेत.

नागरीक चाचण्या करायलाच तयार होत नाही असे कारणही आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. या बाबत आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ.जुईली वनमाळी यांना विचारले असता त्या म्हणाल्या,‘रुग्ण शहराचा निवासी असल्याने त्यांची नोंद महानगर पालिकेच्या अहवालात करण्यात आली आहे. मात्र,काही बाधितांची चाचणी दुसऱ्या शहरांमध्येही झालेली असते, असा दावा त्यांनी केला. चाचण्या करण्यास नागरीकांकडून टाळाटाळ केली जाते.

मात्र, आता चाचण्याची संख्या वाढवली आहे. संचार बंदीत फिरणाऱ्यांची चाचणी केली जाते, तर शहराच्या हद्दीतील तिन्ही रेल्वे स्थानकांवरही चाचण्या केल्या जात आहेत, असेही डॉ. वनमाळी यांनी सांगितले. मुंबईत शुक्रवारी 43 हजारावर चाचण्या झाल्या होत्या. तेव्हा वसई विरार महानगर पालिकेच्या हद्दीत 1 हजार 382 चाचण्या आणि उल्हास नगर महानगर पालिकेच्या हद्दीत 1 हजार 2 चाचण्या झाल्या होत्या.

कॉन्टक्ट ट्रेसिंगची बोंब

मुंबईत बाधीत आढळल्यानंतर त्यांच्या निकटच्या संपर्कातील किमान पाच ते सहा जणांच्या चाचण्या केल्या जातात. मात्र,वसई विरार महानगर पालिकेच्या आकडेवारी लक्ष टाकल्यास असे कॉन्टक्ट ट्रेसिंगही होताना दिसत नाही. तशीच परीस्थीती उल्हास महानगर पालिकेची आहे.