Wednesday, June 10, 2020

शेतकरी बांधवांनी पीक कर्जासाठी अर्ज करावे.-जिल्ह्यात एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर दि. 10 : जिल्ह्यात एकूण 1.46 लाख खातेदार शेतकरी असुन पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभ घेतलेले शेतकरी 1.07 लाख इतके आहेत. मागील वर्षी पालघर जिल्ह्यात पिक कर्ज घेतलेले शेतकरी 14000 असुन पालघर जिल्ह्यात आतापर्यंत पिक कर्ज घेतलेले शेतकरी यांची संख्या 25000 आहे. ज्या शेकऱ्यांनी पीक कर्ज घेतले नसेल अश्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी अर्ज करावा असे आवहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेशी जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा उपनिबंधक डीगांबर हौसारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, लीड बँक व्यावस्थापक, जयानंद भरती वाडा उपविभागीय अधिकारी अर्चना कदम जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सुर्यवांशी आदी अधिकारी उपस्थित होते.
एकूण पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची टक्केवारी 15 ते 20 % आहे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत रू. 1.00 लाखापर्यंत 0% व्याजाने व रू. 1 ते 3 लाख पर्यंत 2 % व्याजाने इतक्या अल्प व्याजदरावर पिक कर्ज उपलब्ध होत असतांना पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात कमी आहे. बँका, पिक कर्जवाटप करणाऱ्या यंत्रणा यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचने आवश्यक आहे. त्याकरीता बँका व इतर सर्व यंत्रणांनी एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचून या योजनेचे महत्व व आवश्यकता शेतकऱ्यांना पटवून देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
सर्व शेतकऱ्यांची खाती ज्या बँकेत आहे, त्या बँकांनी त्यांची पिक कर्जासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. या करिता बँकांनी त्यांचे पिक कर्जाचे अर्ज संबंधित शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात यावे. संबंधित शेतकऱ्यांचे सातबारे ऑनलाईन पद्धतीने संबंधित तहसिलदार यांचेशी संपर्क साधून उपलब्ध करून द्यावा पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक गावाकरिता एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बँकांनी त्यांचे पीएम किसान खातेदारांची यादि व पिक कर्जाचे अर्ज संबंधित नोडल अधिकारी यांचेकडे देऊन त्यांचे मार्फत संबंधित शेतकऱ्यांची पिक कर्जासाठी नोंदणी करण्याकरीता मदत घ्यावी. राष्ट्रीयकृत/खाजगी बँकांनी त्यांचे खातेदारांना (पीएम किसान) त्यांचेकडे उपलब्ध संपर्क क्रमांकावर तसेच त्यांचे बँक करस्पाँडर (BC) यांचेमार्फत संपर्क साधुन शेतकन्यांची पिक कर्जासाठी नोंदणी करून घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी संबधितांना दिले. 
जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेने विविध कार्यकारी सेवा सह संस्थेच्या गटसचिवा मार्फत पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यावी. 6. केंद्र शासनाचे मार्गदर्शक सुचनांनूसार पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेतलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला बँकानी चालु खरिप हंगामात किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देऊन त्यांना पिक कर्जाची मर्यादा मंजुर करणे आवश्यक आहे. वरिल प्रमाणे शेतकऱ्यांची पिक कर्जाकरीता नोंदणी करताना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सदर कर्ज शुन्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी. शेतकऱ्यांना पिक कर्ज त्यांचे क्षेत्रानुसार किती उपलब्ध होऊ शकेल याची माहिती सुद्धा देण्यात द्यावी असेहि निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.
शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवून शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करून थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जवाटपास पात्र केलेले आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पिक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पालघर जिल्ह्यात एकूण 11000 शेतकऱ्यांचे खात्यावर कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच कोरोनाचे पार्श्वभूमीवर काही पात्र शेतकऱ्यांचे खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जमा झालेली नाहि. परंतु पात्र ठरलेले 1500 शेतकरी आहेत. त्यामुळे या 12500 शेतकत्यांना चालू वर्षात नव्याने पिक कर्जवाटप होणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांनी पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांपैकी किती शेतकरी नियमित पिक कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी यांची स्वतंत्र यादी तयार करून प्रत्येक शेतकऱ्याची पिक कर्ज वाटपासाठी नोंदणी करून घ्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.

No comments: