
दि. 2 जून: निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे खांब व तारा यांना हानी पोहोचून 3 व 4 जून रोजी पालघर जिल्ह्यातील वीजपुरवठा दीर्घ कालावधीसाठी खंडीत होऊ शकतो. वीजपुरवठा पूर्वरत करण्यास अधिक वेळ जाऊ शकतो. असे असले तरी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची टीम हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज असून लोकांनी पॅनिक होऊन दुरध्वनीद्वारे वारंवार विचारणा करुन मनोबल खच्ची करु नये व सहकार्य द्यावे असे आवाहन महावितरणच्या अधिक्षक अभियंता किरण नागावकर यांनी केले आहे. रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था करुन ठेवावी अशी सूचनादेखील नागावकर यांनी केली आहे.
महावितरणची आखणी:
हवेचा वेग बघून, अति उच्च दाब वाहिन्या तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडीत होईल. आणि विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास खालील प्रमाणे प्राधान्य देण्यात येईल.
- अती-उच्च दाब वाहिन्या सर्व प्रथम चालू केल्या जातील.
- त्यानंतर उपकेंद्रे चालू केली जातील.
- त्यानंतर टप्प्या टप्प्या ने उच्च दाब वाहिन्या (11 kV ) सुरू होतील. साहजिकच या वाहिन्या सर्व शहरातून फिरलेल्या असल्यामुळे, त्या दुरुस्ती करून, झाडे काढून, संरक्षित करून चालू केल्या जातील.
- उच्च दाब वाहिन्या सुरू करताना सर्व प्रथम प्राधान्य पाणीपुरवठा योजना /दवाखाने असणाऱ्या वाहिन्यांना देण्यात येईल.
- त्यानंतर लघुदाब वाहिन्या टप्प्या टप्प्या ने सुरू करण्यात येतील.
विद्युत पुरवठा वाहिन्यांना झालेल्या नुकसानावर अवलंबून असेल. वरील सर्वं कामे एकत्रितपणे सर्व भागात करण्यात येतील. त्यामुळे काही भागात लवकर, तर काही ठिकाणी उशिराने वीज पुरवठा सुरळीत होईल.
No comments:
Post a Comment