Monday, August 17, 2020

आदिवासी समूहांच्या इतिहासाकडे भारतीय इतिहासकार पाठ का फिरवितात?

भारतीय इतिहासाचा मागोवा घेतला तर त्या इतिहासात आदिवासी समुदायांच्या इतिहासाची दखल भारतीय  इतिहासकारांनी घेतली नसल्याचे लक्षात येते. घेतली असेल तर ती अगदी नगण्य स्वरूपात घेतली आहे.गुजरातच्या  केवडिया क्षेत्रातील आदिवासींची जमीन आदिवासींचा विरोध झुगारून संपादित करणे चालू आहे. संविधानातल्या 5 व्या अनुसुचिचा,पेसा ग्रामसभेचा गळा घोटून हे काम चालू आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या एका आदिवासी इतिहासाविषयक भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतो आहे. मी तो पहिला त्यात ते म्हणतात की, "1857 से  1947 तक आदिवासींयोने हर हुकूमत के खिलाफ लडाई लडी।" कदाचित मोदींपर्यंत मागच्या इतिहासाची माहिती नसावी म्हणून त्यांनी 1857 पासूनचा उल्लेख केला आहे. या देशातला आदिवासी इतिहास समजून घ्यायचा असेल तर वेदकाळाच्याही आधीचा इतिहास मौखिक स्वरूपात आदिवासींनी प्रत्येक पिढीकडे सुपूर्त केला आहे.फक्त तो लिहिला गेला नाही इतकंच. प्रत्येक काळात आदिवासींनि आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष, विद्रोह केला आहे. अगदी इंग्रजी राजवटीच्या काळातलाच विचार करायचा झाला तर केवळ 1857 नाही तर मागे पार 1771 पर्यंत जावे लागते.
1771 तिलका मांझी संघर्ष
1789 मुंडा सरदारांचा संघर्ष 
1809 गुजरातमधील भिलांचा संघर्ष
1839 आसाममधील खम्पती जमातींचा संघर्ष 
1840 महाराष्ट्रातील राघोजी भांगगरेंचा संघर्ष
1855 सिद्धू कान्हू संघर्ष
1862 आंध्र एजन्सी क्षेत्रातील कोया जमातीचा संघर्ष
1888 बिहारमधील मुलकी लढाई
1895 बिरसा मुंडांचा उलगुलान संघर्ष 
अशा अनेक लहान मोठ्या  एकूण 1702 लढाया आदिवासींनी लढलेल्या आहेत. येथे फक्त त्यातील काहींचा उल्लेख केला आहे. यात लाखो आदिवासीं लोकांचे बलिदान गेले आहे मात्र इतिहासकारांनी त्याची दखल न घेतल्याने भारतीय नागरिकांना माहिती नाही. विशेष म्हणजे या संघर्ष करणाऱ्या प्रत्येक आदिवासी नायकाला इंग्रजांनी फाशीचीच शिक्षा दिली आहे. आदिवासींच्या या विद्रोह वृत्तीबद्दल सरदार पटेल यांनी नेहरू आणि मौलाना आझाद यांना आदिवासींबद्दल बोलतांना सांगितले होते की,..."They are the original nationalists."

"ये धरती मेरी नही है। मै इस धरती का हुं।" अशी धारणा बाळगणारा आदिवासी समाज आपली जमीन इंग्रजांच्या ताब्यात कशी देईल? ये धरती मेरी नही है। मै इस धरती का हुं। या विधानांचा अर्थ ज्याला कळतो तोच खरा आदिवासी.
 'ये धरती मेरी है।' असं म्हणणं म्हणजे या जागेची जमिनीची मालकी माझ्याकडे आहे असा अर्थ सूचित होतो आणि आपल्याला माहीत आहे. जो मालक असतो तो आपल्या ताब्यातील वस्तूची विक्री करतो किंवा त्यावर हुकूमत गाजवतो मनमानी करतो.

आता  " ये धरती मेरी नही है। मै इस धरती का हुं।" या म्हणण्याचा अर्थ जाणून घ्या... यामध्ये आपण मालकी सांगत नाही तर त्या धरतीचा मी आहे. तिच्यामुळे मी आहे. ती नसेल तर मीसुद्धा नाही. असा याचा अर्थ होतो. अर्थात इथे धरतीला मातेचा दर्जा मिळतो तर या धरतीवर राहणाऱ्या माणसाला तिच्या लेकराचा दर्जा मिळतो. मग लेकरू आपल्या आईचा सौदा कसा करू शकेल? किंवा आपल्या आईवर इतरांची हुकूमत कशी गाजवू देईल? 

इंग्रजांनी तेच केलं, इथल्या जमिनीवर, जंगलांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि मग इथला आदिवासी पेटून उठला. त्याने तिरकमान हातात घेतलं. विद्रोह केला.संघर्ष केला.लढाया केल्या. शेवटी इंग्रजांना  CNT, SPT ऍक्ट व अनुसूचित जिल्हा किंवा अनुसूचित क्षेत्रासारखे कायदे करणे भाग पाडले.

भारतीय इतिहासाचे नीट आकलन केल्यास आदिवासींनी राजकीय स्वातंत्र्य मिळावे म्हणून कधीही विद्रोह केला नाही. कारण इंग्रज येथे कसे आले? कोणाच्या सहकार्याने त्यांनी इथे जम बसविला? ते काय राजकारण करतात? यापासून आदिवासी अनभिज्ञ होते. इंग्रजांकडे  काम करणारे  इथले  जमीनदार, शेठ-सावकार, भांडवलदार यांच्याकडून आदिवासींचे शोषण,दमन होऊ लागले म्हणून आदिवासी भडकून उठले. आदिवासींच्या या संघर्षाला बिरसा मुंडांनी अधिक व्यापक केले. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक इ.सर्वांगाने एकाच वेळी सर्व शोषण, दमन,विषमता, वर्चस्व इत्यादींच्या विरोधात जो लढा उभा राहिला. तोच बिरसांचा उलगुलान संघर्ष. हा लढा म्हणजे एका अर्थाने आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता,आत्मसन्मान, संस्कृती यांच्या रक्षणाचाच हा लढा होता.

पण भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि राष्ट्रीय  शैक्षणिक धोरणातून तयार झालेल्या अभ्यासक्रमात आदिवासी इतिहासाला फारसं स्थान दिलं गेलं नाही. अभ्यासक्रमातून अमेरिकन राज्यक्रांती,  रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, चीनची साम्यवादी क्रांती ह्या सगळ्या जगातल्या ऐतिहासिक राज्यक्रांत्या शिकविल्या पण इथल्या आदिवासींनी केलेली उलगुलान क्रांती शिकविली नाही. टुंड्रा प्रदेशातला भूगोल शिकविला. तिकडची इग्लुची घरे शिकविली पण इकडची आदिवासींची कारवीच्या कुंडांची घरे शिकविली नाही. इथली भाषा, इथला निसर्ग,इथली शेती, इथल्या मातीवर उभी राहिलेली संस्कृती नीट शिकविली नाही. आदिवासींची अस्मिता आणि ओळख पुसण्याचेच जणू प्रयत्न केले गेले की काय याची दाट शंका येते कारण रमाकांत केशव देशपांडे उर्फ बाळासाहेब देशपांडे हे ठक्कर बाप्पा व गोळवलकर गुरुजी यांच्या सहकार्याने 26 डिसेंबर 1952 साली " अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम "  अशा नावाने संस्था स्थापन करून  या संस्थेचे ध्येयवाक्य असे ठेवतात:-

 "नगरवासी, ग्रामवासी, वनवासी : हम सभी हैं भारतवासी"

सांगा , या ध्येय वाक्यात  कुठे आहे वनवासींचे कल्याण?
"वनवासी कल्याण आश्रम" आणि संस्थेचे ध्येय वाक्य यांच्या अर्थात विरोधाभास जाणवतो. आदिवासींचा स्वतंत्र नामोल्लेख होऊ नये या भीतीपोटी हे ध्येय वाक्य ठेवले असावे काय? हे ध्येय वाक्य ठेवण्यामागे कारणच काय? शहरातले लोक म्हणत होते का,आम्ही भारतवासी नाहीत म्हणून?  गावांमध्ये राहणारे लोक सांगत होते का,आम्ही भारतवासी नाही म्हणून?  आदिवासीं सांगत होते का होते का आम्ही भारतवासी नाहीत म्हणून? मग हे असे ध्येयवाक्य ठेवण्यामागे कारणच काय? ते मूळ कारण म्हणजे "आदिवासीच  इथले मूळ नागरिक आहेत" हे लपविण्यासाठी. म्हणूनच ते आदिवासींना आदिवासी न म्हणता वनवासी म्हणतात. म्हणूनच त्यांनी Aboriginal, Aborginies, indigenous people, मूलनिवासी किंवा  आदिवासी अशा नावाची संस्था स्थापन न करता वनवासी नावाने स्थापन केली... आणि  "  मानवतेची कास धरू,आदिवासींचा विकास करू"  किंवा  " आदिवासींना सोबत घेऊ, भारत देशा पुढे नेऊ" असल्या आशयाची तरी संस्थेची ध्येयवाक्य पाहिजे होती म्हणजे खरेच आदिवासींच्याच विकासासाठी किंवा त्यांच्या भाषेत वनवासींच्याच विकासासाठी ही संस्था आहे हे समजले असते. संस्थेची जी प्रमुख कार्ये दिलेली आहेत, त्यात आर्थिक विकास, शिक्षण, आरोग्य, संस्कृती रक्षण, संस्कार आणि वनवासी खेळ असा उल्लेख आहे. मग सांगा 1952 पासून आतापर्यंत आदिवासींचा किती आर्थिक विकास केला? किती आदिवासींना चांगलं शिक्षण दिलं? आदिवासींना किती आरोग्य सोयी पुरविल्या? एकदोन किरकोळ कामे केली असतील ते सांगतीलही पण  जर या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नसतील तर मग वनवासी कल्याणाचे ढोंग कशासाठी?

आदिवासींच्या विस्थापनावेळी वनवासी कल्याण का लक्ष देत नाही? सरदार सरोवरात जमिनी गेलेल्या विस्थापित होऊन पुनर्वसित न  झालेल्या आदिवासींचा लढा मेधा पाटकरांनीच लढावा का? 13 फेब्रुवारी 2019 ला 20 लाख आदिवासींना वनातून बाहेर काढण्याचे कारस्थान रचले गेले तेंव्हा वनवासी कल्याण आश्रम कुठे होते? झारखंड, छत्तीसगड, चंद्रपुर ,गडचिरोली  अशा काही भागांमध्ये आदिवासींना नक्षलवादाच्या नावाखाली आदिवासी मरत आहे. तिकडे भांडवलदार आदिवासींच्या जमिनी लुटण्यासाठी टपले आहेत. तिकडे वनवासी कल्याण आश्रम का लक्ष देत नाही? नुकतंच गुरातमधील स्टेचू ऑफ युनिटीच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी लुटण्याचे काम चालू आहे.तिकडे आदिवासींचे आंदोलन चालू आहे. वनवासी कल्याण आश्रमवाले हे सगळे मुकाट्याने का बघत बसलेत?
आदिवासी बांधवांनो, आदिवासींचा इतिहास लपविणारे कोण? आणि आदिवासींच्या नावाने जगणारे कोण? हे वेळीच  ओळखा. काही आदिवासी त्यांना मिळालेले आहेत.जसं रामाला बिभीषण मिळालेला होता. बिभीषणामुळेच रावण मेला.तसेच तुम्हीही बिभीषण वृत्तीच्या आपल्याच लोकांमुळे अस्तित्वहीन होणार आहात. काही आदिवासी माणसेच वनवासी कल्याण आश्रम आणि RSS या संस्थांकडे काम करतात.ती आदिवासी विरोधी काम करतात कारण त्यांचे तिथे पोट भरते आहे म्हणून. त्यांना समाजातून सोडून द्या. आपण आपला इतिहास, आपली संस्कृती, आपल्या जमिनी यांचे रक्षण करा.यातच तुमचे हित आहे. 
विशेष म्हणजे आपला इतिहास आता आपणच लिहायला हवा.आपणच नव्या पिढीला शिकवायला हवा. जोपर्यंत भारतीय इतिहासकार निष्पक्षपातीपणे, वस्तुनिष्ठ व मानवतेच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहू शकत नाहीत तोपर्यंत...आपणच पुढाकार घ्या. आपणच खरा मानव घडवूया या. कारण या विश्वाच्या आधीचेही आपणच आणि पृथ्वीच्या अंतासमयी शेवटचेही आपणच असणार आहोत पण आपण जागृत राहिलो तरच हे शक्य आहे.
#जय आदिवासी जोहार

No comments: