Friday, June 26, 2020

ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्थानिकांना नोकऱ्या देणार ठाकरे सरकार

मुंबई – महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात कामगार कमतरतेची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून यामध्ये स्थानिक तरुणांना नोकरीच्या विविध ऑफर देण्यात आल्या आहेत. या पोर्टलमध्ये सरकारी नोकऱ्यांसोबतच खासगी कंपन्यांमध्येही नोकऱ्यांची तपशीलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना राज्याचे कौशल्य विभाग मंत्री नवाब मलिक म्हणाले की, स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विभागामार्फत rojgar.mahaswayam.gov.in or www.mahaswayam.gov.in हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर उमेदवार आपल्या आवडीनुसार नोकरीसाठी नोंदणी करू शकतात. याद्वारे, बेरोजगार तरुणांना चांगली नोकरीची संधी मिळू शकते, त्याचबरोबर त्यांना राज्यातील कामगार कमतरता दूर करण्यातही यश मिळू शकेल.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मनसेने अशी मागणी केली आहे की राज्यातील 80 टक्के रोजगार स्थानिक तरुणांना देण्यात यावा आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची काटेकोरपणे नोंदणी करावी.

पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांसाठी जाहिर आवाहन

पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांसाठी जाहिर आवाहन 

जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाणेसाठी इच्छुक आहेत त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
स्थलांतरीत मजुरांच्या अडचणीबाबत याचिका क्र.६/२०२० मध्ये मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या नोदणी करिता https://migrant.mahabocw.in/migrant/form हे संकेतस्थळ तयार केले आहे. तरी पालघर जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी करावी.

तसेच पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्थलांतरीत मजुरांच्या बाबतीत मदत कक्ष (Help Desk)तयार करण्यात आला असून . या मदत कक्षांचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
तहसील कार्यालय डहाणू : 02528-221182, 
तहसील कार्यालय तलासरी : 9637692102/9637692127, 
तहसील कार्यालय पालघर : 02525-254930, 
तहसील कार्यालय वसई : 0250-2322007, 
तहसील कार्यालय वाडा : 02526-271423, 
तहसील कार्यालय विक्रमगड : 02520-240172, 
तहसील कार्यालय जव्हार : 02526-271423, 
तहसील कार्यालय मोखाडा : 02529-256826

पालघर जिल्ह्यातील जे स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यास इच्छुक आहेत त्यांनी वर नमूद केलेल्या कामगार विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. सदर संकेतस्थळावर नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर, भ्र.क्र. 9822331899 वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.

Wednesday, June 24, 2020

गरजु बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी नाव नोंदणी करावी-जिल्हाधिकारी


पालघर दि. 24 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हयातून मजूर व कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वत : च्या मुळगावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांवरील मणुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजु बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी आपली नोंदणी तातडीने www.mahaswayam.gov.in या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
केंद्र शासनाच्या CNV Act 1959 (रिक्त पदे सक्तीने अधिसुचीत करणारा कायदा) नुसार राज्य शासकीय , निमशासकिय अस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सेवायोजन कार्यालयास (एम्प्लॉयमेंट ऑफिस) आता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे नामकरण करण्यात आलेल्या कार्यालयास कळविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. सबब आपल्या आस्थापनांमध्ये रिक्त असणारे व यापुढे रिक्त होणारे पदे शासनाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसुचित केल्याशिवाय भरती करू नये तसं केल्यास कायद्याचे उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना कायदेशीर कार्यवाहीस पात्र होणार आहे.असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
जिल्हयामध्ये Online Virtual Job Fair चे आयोजन तात्काळ करावयाचे असल्याने आपल्या आस्थापनेमध्ये असलेल्या रिक्त पदांचा तपशिल www.mahaswayam.gov.in वेबसाईटवर नोंदविला जाईल व ज्या बेराजगरांनी नाव नोंदणी केली आहे ते त्या पदासाठी आपला पर्याय Online नोंदविता येणार आहे. यामुळे उमेदवारांची सर्व माहिती उद्योजकांस उपलब्ध होईल त्यानुसार उद्योजक उमेदवारांची Online किंवा प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करणार आहे. तरी जिल्हयातील सर्व आस्थापनांनी आपल्या रिक्त जागा दि. २६/०६/२०२० पर्यंत नोंदणी करून या कार्यालयाच्या palgharrojgar@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठविण्यात यावा असेहि आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत


ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई, दि. २३: लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Maha Info Corona Website

यावेळी डॉ. राऊत म्हणाले, महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही. जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच आहे. या वीजबिलाची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने विशेष लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतरही काही शंका असल्यास ग्राहक आवश्यकतेनुसार https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरून वाढीव वीजबिलांची पडताळणी करू शकतात. तसेच महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल. तसेच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली.

डॉ. राऊत म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीज बिल देण्यात आले. मात्र या कालावधीत महावितरणच्या आवाहनानुसार स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. आता जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांवर एका पैशाचाही भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येत आहे, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात आज कोरोना मृत्यू 4, नवे पॉझिटीव्ह 199!


दि. 23 जून 2020: आज वसई महानगरामध्ये कोरोनाच्या संसर्गाने 4 मृत्यू झाले असून वसई तालुक्यातील मृतांची संख्या 99 झाली आहे. पालघर तालुका 4, वाडा व विक्रमगड तालुक्यातून प्रत्येकी 1 मृत्यू झालेले असल्याने पालघर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या आता 105 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यामध्ये आज नव्या 199 कोरोना पॉझिटीव्हची भर पडली असून, त्यातील विक्रमगड तालुक्यातून 15, जव्हार तालुक्यातून 12, वाडा तालुक्यातून 7, डहाणू तालुक्यातून 3, मोखाडा तालुक्यातून 2, पालघर तालुक्यातून 1 रुग्ण वाढले आहेत. उर्वरीत 159 पॉझिटीव्ह वसई तालुक्यातील आहेत.