Wednesday, July 15, 2020

HSC 12th Result 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्ड यांच्यातर्फे 12 वी निकाल उद्या दुपारी 1:00 वाजता जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर  पाहता येईल. 

असोसिएटेड कॅप्सुलचा व्यवस्थापन सदस्य पॉझिटीव्ह

दि. 14 जुलै: डहाणू तालुक्यातील असोसिएटेड कॅप्सुल ही अत्यावश्यक सेवा ह्या सदरातील कंपनी असल्याने ती लॉकडाऊन काळातही चालू राहिली. लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगार कामावर येत नसल्याने कंत्राटी कामगारांच्या जोरावर कामकाज चालवण्यात आले. त्यातच कंपनीचे विस्तारीकरणाचे काम सुरु असल्याने मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर कंपनीच्या आवारात राहिले होते. काही कामगार वसईतील हॉटस्पॉटमधून ये जा करीत होते. आता, कंपनीच्या स्थलांतरित मजूरांपैकी किमान 11 जणांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले असून 90 पेक्षा जास्त लोकांना क्वारन्टाईन करण्यात आले आहे. या आधीच डहाणू शहरातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे निवास असलेल्या इमारतीला प्रतिबंधीत करण्यात आले होते. काल (13 जुलै) रात्री डहाणू मल्याण येथील एका व्यवस्थापन सदस्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या शिवाय कंपनीच्या कंत्राटी कामगारांना कोरोनाची लागण झाली असल्यास त्याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही.

Tuesday, July 14, 2020

दिवसभरात कोरोनाचे 405 नवे +Ve आणि 7 मृत्यू

पालघर, दि. 13 जुलै: जिल्ह्यात आज नवे 405 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले सर्व जण वसई महापालिका क्षेत्रातील आहेत. आज निष्पन्न झालेल्या कोरोना बाधीतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:- वसई विरार महापालिका क्षेत्र 372, वसई तालुका ग्रामीण क्षेत्र 7, पालघर तालुका 15, डहाणू तालुका 9, विक्रमगड तालुका 1.

Sunday, July 12, 2020

पालघर जिल्ह्यात कोरोनामुळे 7 दिवसांत 34 मृत्यू – एकूण मृत्यू 178

दि. 12 जुलै: पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मागील 7 दिवसांत 34 जणांनी आपले प्राण गमावले असून मृत्यूंची संख्या 178 झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक 155 मृत्यू वसई विरार महानगर क्षेत्रातील असून वसई ग्रामीण क्षेत्रात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुक्यात 8 जण, जव्हार तालुक्यात 2 जण, वाडा तालुक्यात 2 जण व विक्रमगड तालुक्यात 1 जणाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यामध्ये 7 दिवसांत 2105 कोरोनाग्रस्तांची भर पडली असली तरी, 3228 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील 787 ने घटली आहे. 5 जुलै रोजी 3701 जण रुग्णालयात दाखल होते. आज ही संख्या 2914 इतकी घसरली आहे.

पालघर जिल्ह्याच्या वसई तालुका वगळता उर्वरीत भागात, 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या 293 ने वाढून 1362 झाली आहे. त्यापैकी 976 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 373 जणांवर उपचार चालू आहेत. ही आकडेवारी दिलासादायक असून 7 दिवसांत मृत्यूचा आकडा 3 ने वाढून 13 झाला आहे.

तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:-

पालघर तालुक्यात 7 दिवसांत 171 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 567 झाला आहे. त्यातील 360 जण बरे झाले असून 199 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 ने वाढून 8 झाली आहे.

वाडा तालुक्यात 7 दिवसांत 37 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 306 झाला आहे. त्यातील 252 जण बरे झाले असून 52 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 कायम राहिली आहे.

जव्हार तालुक्यात 7 दिवसांत 24 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 153 झाला आहे. त्यातील 119 जण बरे झाले असून 32 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 ने वाढून 2 झाली आहे.

विक्रमगड तालुक्यात 7 दिवसांत 9 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 119 झाला आहे. त्यातील 104 जण बरे झाले असून 14 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 कायम राहिली आहे.

डहाणू तालुक्यात 7 दिवसांत 43 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 162 झाला आहे. त्यातील 103 जण बरे झाले असून 59 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.

मोखाडा तालुक्यात 7 दिवसांत 7 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 30 झाला आहे. त्यातील 22 जण बरे झाले असून 8 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.

तलासरी तालुक्यात 7 दिवसांत 2 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 25 झाला आहे. त्यातील 16 जण बरे झाले असून 9 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.

Friday, July 10, 2020

विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण, पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती येणार

एमयुटीपी-३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण

मुंबई,  दि ९ : एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान वर्षा येथे यासंदर्भातील सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली.

याप्रसंगी नगर विकास मंत्री मंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास प्रवीण परदेशी, एमएमएमआरडीए आयुक्त आर राजीव, एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर एस खुराणा, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.सोनिया सेठी, एमआरव्हीसीचे वित्त संचालक अजित शर्मा यांची उपस्थिती होती.

या करारामुळे खालील प्रकल्पांना वेग येईल.

पनवेल-कर्जत दरम्यान २८ किमी नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिका टाकणे – २७८३ कोटी 

ऐरोली-कळवा दरम्यान ३.५ किमी उन्नत रेल्वे मार्ग बांधणे – ४७६ कोटी

विरार-डहाणू दरम्यान ६३ किमी रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करणे (तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका टाकणे) – ३५७८ कोटी

नवीन रेल्वे गाड्या खरेदी करणे (४७ रेक्स) – ३४९१ कोटी

मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाच्या मध्य विभागात ट्रेस पास कंट्रोल – ५५१ कोटी

तसेच तांत्रिक सहाय्य – ६९ कोटी

मुंबई व उपनगर रेल्वे सेवेमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (MUTP-III) या रु.१०,९४७ कोटी प्रकल्प पुर्णत्व किमंतीच्या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पास मंजूरी दिली होती.

राज्य शासनाने भारतीय रेल्वेच्या सहभागाने मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-१ व टप्पा- २ च्या धर्तीवर ५०:५० आर्थिक सहभागातून हा प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आली आहे.