राज्यातील खरीप हंगाम आता काढणीच्या टप्प्यात असताना सतत होणाऱ्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पिकांची मोठी हानी होत आहे. काढणी करून शिवारात ठेवलेल्या सोयाबीन, कापूस किंवा इतर कोणत्याही पिकाची काढणी पश्चात पावसामुळे हानी होत असल्यास पंतप्रधान पीक वीमा योजनेतून भरपाई मिळते. त्यासाठी शेतकऱ्यांना घरबसल्या केवळ मोबाईलमधून अर्ज दाखल करता येतो. विमा योजनेच्या अॅप्लिकेशनद्वारे पीक नुकसानीची माहिती कळवता येते व नुकसान भरपाईसाठी दावा करता येतो. याबाबत वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांना मोलाच्या टीप्स दिलेल्या आहेत...
पीक वीमा कोणत्या बाबीसाठी मिळतो..
- शेतात काढून ठेवलेल्या, वाळत घातलेल्या पिकाचे पावसाने नुकसान झाल्यास ७२ तासात माहिती (इंटिमेशन) दिल्यास वीमा भरपाई मिळते.-इंटिमेशन हे मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे किंवा टोल फ्री नंबरवर देखील देता येते.
- इंटिमेशन जर मोबाईल अप्लिकेशनद्वारे दिले तर शेवटी डॉकेट आयडी मिळेपर्यंत सर्व ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बिनचूकपणे पार पाडावी लागेल.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी काय कराल...
- गुगल मोबाईल प्ले स्टोअरवर जा. तेथे सर्च ऑप्शनमध्ये Crop loss असे टाईप करा. Install शब्दावर क्लिक करा. दाबा. त्यानंतर ३.५८ एमबीचे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड होईल.
- Crop Insurance नावाचे अॅप डाऊनलोड झाल्यावर Open शब्दावर क्लिक दाबा. त्यानंतर इंग्रजीमध्ये Pradhan Mantri Fasal Bima Yojana असे पान उघडते.
- या पानावर सर्वात खाली Change language शब्दांवर क्लिक करा. त्यानंतर तीन पर्याय येतील. सर्वात खाली मराठी पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर खाली Apply शब्दावर क्लिक करा व Ok क्लिक करा.
- त्यानंतर अॅपवर पुन्हा Open क्लिक करा. त्यानंतर आपणाला मराठीमध्ये सर्व पर्याय दिसतील. त्यापैकी ‘नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा’ या पर्यायावर क्लिक करा.
- पीक नुकसान’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर दोन पर्याय येतील. त्यापैकी ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ यावर क्लिक करा.
- त्यानंतर मोबाईल क्रमांकाची पडताळणी होते. त्यासाठी दिलेल्या बॉक्समध्ये आपला मोबाईल क्रमांकाची नोंद करा. त्यानंतर ‘ओटीपी पाठवा’ यावर क्लिक करा.
- ओटीपी नंबरसाठी थोडा वेळ थांबताच ऑटो फिल कोड येतो. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर हंगाम येतात. त्यापैकी ‘खरीप’वर क्लिक करा. त्यानंतर वर्ष येत असून ‘२०२०’ या संख्येवर क्लिक करा. त्यानंतर योजना असा पर्याय येतो. त्यात Pradhan Mantri Fasal Bima Yojana क्लिक करा. त्यानंतर राज्य यादी येते. त्यात Maharashtra क्लिक करा. त्यानंतर शेवटी ‘निवडा’ या शब्दावर क्लिक करावे.
- यानंतर अर्जाचा स्रोत असे पान येते. त्यात Bank, CSC, Farmers online, Intermediary असे शब्द येतात. अशावेळी आपण यापूर्वीचा विमा अर्ज कुठे भरला होता. त्यानंतर शब्दावर क्लिक करावे. समजा सेवा केंद्रावर असल्यास CSC वर क्लिक करावे.
- CSC वर क्लिक करताच अर्ज व पॉलिसी क्रमांक द्यावा. पीकविमा नोंदविल्यानंतर प्रत्येकाला पॉलिसी क्रमांक मिळतोच. तोच याठिकाणी अचूक भरावा. तो पुन्हा खात्री करून नंतर ‘यशस्वी’वर क्लिक करावे.
- यानंतर यादीतून अर्जाची निवड करा, अशी ओळ येते. त्याखाली इतर पर्याय निवडा अशी ओळ असून त्यावर क्लिक केल्यावर आपल्या पॉलिसी क्रमांकावरील नाव, जिल्हा, खाते क्रमांक,विमा हप्ता अशी माहिती तेथे दिसते. यानंतर खाली ‘पिकाचे नाव’ यावर क्लिक करावे.
- त्यानंतर लोकेशन मागितले जाते. त्यासाठी Ok वर क्लिक करा. यानंतर घटनेचा प्रकार असा शब्द आहे. त्यावर Select केल्यानंतर Animal Infestation, Cloud Burst, Cyclone, Cyclonic Rains, Diseases, Drought, Extra Rainfall असे पर्याय येतात.
- वरील पर्यायांपैकी आपल्याला काढणीपश्चात पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी दावा करायचा आहे. त्यामुळे Cyclonic Rains या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर घटनेचा दिनांक टाकावा. पाऊस पडून नुकसान केव्हा झाले ती तारीख नोंदवावी. समजा ११ तारीख असेल तर ११ वर क्लिक करून ‘ठिक आहे’ या शब्दावर क्लिक करावे. त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा अशी ओळ आहे. त्याखाली बॉक्समध्ये Select क्लिक करा. तेथे Standing Crop, Harvested, Cut And Spread Bundled condition for drying असे पर्याय येतात. त्यापैकी सोयाबीन समजा कापून ठेवलेले असेल तर Cut and Spread वर क्लिक करावे
- यानंतर त्याच पानावर नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी असा बॉक्स येतो. तेथे झालेल्या नुकसानीची अंदाजे टक्केवारी द्यावी. उदा. ८०, ९०, १०० असे. त्यानंतर शेरा असा एक बॉक्स आहे. तेथे टक्केवारीचा आकडा टाकून लॉस असे इंग्रजीत लिहावे. उदा. ८० loss
- यानंतर फोटो अपलोड असा बॉक्स येतो. तेथे आपल्या शेताचा फोटो अपलोड करण्यासाठी आधी परवानी द्यावी लागेल. त्यावेळी Allow Crop Insurance to take photo and record Vidio अशी ओळ येईल. त्याखाली Allow शब्दावर क्लिक करावे. फोटो काढावा व खाली बरोबरचे चिन्ह असेल त्यावर क्लिक करावे. त्यानंतर व्हिडिओ अपलोड करा, असा बॉक्स आहे. तेथे एक मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करावा. त्यासाठी व्हिडिओ काढण्याकरिता लाल वर्तुळावर क्लिक करावे. पुन्हा बरोबर चिन्हावर क्लिक केल्यावर व्हिडिओ अपलोड होतो.
- ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यावर सादर करा या शब्दावर क्लिक करावे. त्यानंतर ऑनलाइन अप्लिकेशनवर अर्ज अपलोड होतो. शेवटी Crop loss Reported Successfully अशी ओळ येते व त्याखाली डॉकेट आयडी येतो. तोच आयडी क्रमांक अतिशय महत्त्वाचा आहे. तो लिहून ठेवा अथवा त्याचा स्क्रिनशॉट घेऊन ठेवा. याच आयडीच्या माध्यमातून आपल्याला अर्जाची स्थिती देखील कळते.
जोखीम कार्यपध्दतीच्या शंकांबाबत कृषी आयुक्तालय काय म्हणते ?
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Localized Calamities) व नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान (Post Harvest Losses ) या दोन्ही बाबींकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. काही जिल्ह्यांमध्ये पीक काढणीनंतर ऑक्टोबरमधील पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंचनामे महत्त्वाचे ठरतात, असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
वैयक्तिक पंचनाम्यासाठी अट काय आहे?
“हंगाम कालावधीत अधिसूचित क्षेत्रातील शेतात पीक कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवला असल्यास फक्त अधिसूचित पिकांसाठीच आणि तो देखील कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवडयांपर्यंन्त (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस किंवा अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे,” असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे. तसेच, काढणीपश्चात नुकसान जोखीम अंतर्गत नुकसान भरपाईचे काही निकष आहेत. ते कोणते हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे.
भरपाई कोणत्या खर्चाच्या प्रमाणात मिळते ?
अधिसूचित विमा क्षेत्रात अधिसूचित पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला व पूर्वसूचना (इंटिमेशन) दिलेल्या शेतकऱ्यांसाठी भरपाईची तरतूद वैयक्तिक स्तरावर लागू राहील, असे आयुक्तालय म्हणते. असे कमाल दायित्व हे अधिसूचित पिकाच्या बाधित क्षेत्राच्या विमा संरक्षित रक्कमे एवढे राहील.तसेच,जोखमीचा धोका घडेपर्यंत पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठा खर्चाच्या प्रमाणात नुकसान भरपाई ही विमा संरक्षित रकमेच्या अधीन राहील, अशी अट आहे.
माहिती कळविण्याच्या पद्धती कशी आहे?
शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत याबाबतची पूर्वसूचना Crop Insurance App अथवा टोल फ्री क्रमांकाद्वारे विमा कंपनीस किंवा संबंधित बँकेला व कृषी विभागाला दिली पाहिजे. सर्वप्रथम प्राधान्याने Crop Insurance App या मोबाईलॲपद्वारे पूर्वसूचना देण्यात यावी. ॲपद्वारे शक्य न झाल्यास विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर सूचना देण्यात यावी. याशिवाय बँक किंवा कृषी विभागास माहिती द्यावी. ही माहिती संबंधित बँक किंवा कृषी विभागाकडून संबंधित विमा कंपनीला ४८ तासात पाठवण्यात येते. इतर नोंदणी स्त्रोतांकडून देखील पूर्वसूचना येतात. त्याची नोंद संबंधित कार्यालयाने अथवा विमा कंपनीने राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
भरपाईसाठी कोणती कागदपत्रे द्यावी लागतात?
नुकसान भरपाईबाबत पूर्वसूचना मोबाईल ॲपद्वारे कळविली नसल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा लागतो. त्यासाठी अर्ज असतो. विहित नमुन्यातील अर्ज देताना त्यासोबत काही आवश्यक कागदपत्रांसह माहिती द्यावी लागते. त्यात शेतकऱ्याचे नाव, बाधित सर्व्हे नंबर, पीकनिहाय बाधित क्षेत्र, पोर्टलवरील शेतकरी अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर, कर्जदार शेतकरी असल्यास केसीसी खातेदार क्रमांक,बिगर कर्जदार शेतकरी असल्यास बॅंकेचा बचत खाते क्रमांक,वीमा हप्ता भरल्याचा पुरावा द्यावा लागतो. वीमा कंपनीस विहित कालावधीत सादर करणे आवश्यक, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
माहिती किती दिवसात सादर करावी लागते?
काही वेळा शेतकरी परिपूर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू शकत नाही. अशा वेळी हाती असेल त्या माहितीच्या आधारे अर्ज सादर करता येतो. पण अशा वेळी उर्वरित माहिती किंवा अत्यावश्यक कागदपत्रे सात दिवसांच्या आत वीमा कंपनीला द्यावी लागतात. पीक नुकसानीचा पुरावा म्हणून Crop Insurance App या मोबाईलॲपद्वारे नुकसानग्रस्त क्षेत्राचे छायाचित्र वीमा कंपनीस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्थात, त्यानंतर पीक नुकसानीचे सर्वेक्षण होते. त्यासाठी संयुक्त समिती आहे. या समितीत वीमा कंपनीचा पर्यवेक्षक,शासन प्रतिनिधी आणि संबंधितशेतकरी यांचा समावेश असतो, असा निर्वाळा आयुक्तालयाने दिला आहे.
सर्व शेतकरी भरपाईस केव्हा पात्र होतात?
- संयुक्त समितीने योग्य प्रमाणात केलेल्या नमुना सर्वेक्षणाच्या आधारे वीमा कंपनीमार्फत नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येते.काढणीपश्चात जोखिमकरीता जर बाधित क्षेत्र हे अधिसूचित वीमा क्षेत्राच्या २५ टक्क्यांपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर २५ टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसूचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी (विमा योजनेत सहभागी झालेले व पिकाचे नुकसान वेळेत पूर्वसूचना दिलेले) नुकसानभरपाईस पात्र होतील, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
- वीमा कंपन्यांमार्फत सर्वेक्षणासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, शेतकऱ्यांसाठी काढणी पश्चात जोखीम अंतर्गत सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व सर्व संबंधित विमा कंपन्यांना विशेष सूचना दिल्या आहेत, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
विमा कंपन्यांशी कुठे संपर्क साधाल?
विमा कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक आहेत. मात्र, त्या जिल्ह्यात कोणती कंपनी आहे हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तातडीने संपर्क करणे आवश्यक आहे.
जिल्हे व त्यासाठी नियुक्त केलेली विमा कंपनी आणि त्यांचे कंसात दिलेले टोल फ्री क्रमांक असे
अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा यासाठी भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००१०३७७१२), परभणी, वर्धा, नागपूर, वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, जालना, गोंदिया, कोल्हापूरसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००१०२४०८८), नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००१०३५४९०), औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला,धुळे, पुणे जिल्ह्यासाठी एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी (१८००२६६०७००), उस्मानाबाद बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००२०९५९५९) तर लातूर व बीडसाठी भारतीय कृषी विमा कंपनीशी (१८००४१९५००४ संपर्क साधावा लागेल.
पीक काढून शेतात वाळवण्यासाठी ठेवले असल्यास व १५ दिवसाच्या आत पाऊस झाल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीपासून ७२ तासाच्या आत इंटिमेशन द्यावे. त्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन वापरता येईल. टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येईल. बॅंकेकडे देखील अर्ज देता येईल. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा. त्यात काहीही अडचण आल्यास कृषी कार्यालयांची मदत घ्यावी.
— धीरज कुमार, कृषी आयुक्त
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मोबाईल अॅप्लिकेशन वापरावे. मात्र, कनेक्टिव्हिटीची अडचण असल्यास गाव पातळीवर कृषी सहायकाकडे ऑफलाइन अर्ज द्या. आम्ही कृषी सहायकांना त्यांच्या मुख्यालयात थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. बॅंकेत किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात देखील ऑफलाइन अर्ज देता येतो.
— शंकर तोटावार, (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम)
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढून ठेवलेल्या पिकांचे म्हणजे काढणी व मळणीच्या कामात पाऊस झाल्याने नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हवी असल्यास ७२ तासांच्या आत मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे किंवा विमा कंपनीला टोल फ्री क्रमांकावर अथवा कंपनीच्या ई-मेलवर ‘इंटिमेशन’ द्यावे. काही अडचण आल्यास कृषी सहायकांच्या माध्यमातून अडचणींचे निराकरण करावे.
— ऋषिकेश मोडक, (जिल्हाधिकारी, वाशीम)