जिल्ह्यात कोव्हीड 19 ने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून ही गोष्ट चिंताजनक असल्याचे सांगून, मृत्यूदर कमी करण्यासाठी संशयित रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. आतापर्यंत मृत्यू पावलेल्या व्यक्तींपैकी 60% व्यक्ती इस्पितळात दाखल झाल्यानंतर 72 तासांच्या आत मृत्यू पावलेल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे. संशयित रुग्ण चाचणी करून घेण्यास पुढे येत नाहीत व गंभीर परिस्थिती उद्भवल्यानंतरच इस्पितळात दाखल होत असल्याने उपचार करण्यास पुरेसा कालावधी मिळत नाही अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आता दररोज पाचशे RTPCR आणि दोनशेहून अधिक अँटीजन टेस्ट आता करता येऊ शकणार आहेत.
रिव्हेरा, टिमा व पोशेरी या कोव्हीड रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन टॅन्क बसवण्यास परवानगी मिळाली असून ऑक्सिजन ची सुविधा लवकर उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यापासून डहाणू MRHRU लॅब मध्ये 200 मोफत चाचण्या करता येणार असून जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तरीही कोणाला काही मदत हवी असल्यास 18001215532 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. प्रत्येक तालुक्याअंतर्गत वॉर रूम स्थापीत करण्यात आल्या असून covidbed.palghar.info ह्या लिंकद्वारे कोव्हीड 19 चाचणी, बेड ची उपलब्धता, घरी विलगीकरण ह्या बाबींची माहिती मिळू शकणार आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोना वर मात करू या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment