Thursday, July 23, 2020

मुंबई, ठाण्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत गहू व तांदळाचे वाटप

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे जुलै 2020 या महिन्याचे नियमित अन्नधान्याचे 71 % इतक्या शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आलेले आहे व त्यासोबतच प्रति व्यक्ती  3 किलो गहू व 2 किलो तांदूळ असे एकूण 5 किलो मोफत अन्नधान्याचे  वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत 2481 मे.टन गहू व 2310 मे.टन तांदूळ इतक्या अन्नधान्याचे 18 % शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई चे कैलास पगारे यांनी दिली.

अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना तसेच निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून तसेच संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानांतून गर्दी न करता योजनानिहाय धान्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन लवकरात लवकर धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

Wednesday, July 22, 2020

आदिवासी मुली ठरल्या अव्वल

"या" तारखेच्या आत लागणार दहावीचा निकाल

कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवना पासून सर्वच गोष्टी विस्कळीत झाल्या आहेत. त्याचाच परिणाम शैक्षणिक क्षेत्रावरही झालेला दिसतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील बारावीचा बोर्डाचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. परंतु अद्याप दहावीचा निकाल लागलेला नाही. 

       राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोलीमध्ये बोलताना 31 जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं. परंतु, अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

      यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात घेण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. भूगोलाचा पेपर रद्द केल्या नंतर बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून भुगोल पेपरच्या गुणांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. यामुळे आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले आहे.

Monday, July 20, 2020

डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रमाचा उद्या ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पाच हजार तरुणी होणार ‘सायबर सखी’

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या दि. 21 जुलै रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील 10 शहरातील 5000 महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

Maha Info Corona Website

मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे, फसवणूक यातही वाढ होत आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम सुरु होत आहे. 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

100 वेबिनार मधून राज्याच्या 10 शहरातील 5000 तरुणींना ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येईल. शुभारंभाचा वेबिनार उद्या दि 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार असुन यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मार्गदर्शन करतील. घन:श्यामदास सराफ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित वेबिनारमधे सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांसह मुंबई पोलिस सायबर शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकरही उपस्थित राहणार आहेत.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्यापासून आयोजन

मुंबई शहर जिल्ह्यातील युवकांना मिळणार लाभ

मुंबई, दि. २० : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे २१ ते २४ जुलैदरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहर जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यास सहाय्य मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत.

Maha Info Corona Website

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केल्याने अनेक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. त्यामुळे अनेक परप्रांतीय कामगार/ मजूर हे त्यांच्या गावी परत गेल्याने किंवा जात असल्याने आता टाळेबंदी उठविल्यानंतर हे उद्योग सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. उद्योगांना मनुष्यबळाची तर युवकांना रोजगाराची गरज असल्याने नियोक्ते आणि रोजगार इच्छुक यांच्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या नामांकित १३ कंपन्या व नियोक्त्यांकडून www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदासाठी अर्हता पात्र किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स (skype, Whatsapp, etc) द्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक असून तसेच अॅन्ड्रॉईड मोबाईलधारकांनी mahaswayam हे पोर्टल डाऊनलोड करून शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करावी.

भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे या वेबपोर्टलवर अधिसूचित करण्याचे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ०२२-२२६२६३०३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त नियोक्ते आणि रोजगार इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राच्या  सहायक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे