Tuesday, August 6, 2024

३४ तालुक्यांत अँपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी



३४ तालुक्यांत अॅपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी ■ उर्वरित भागांत राज्याच्या ई-पीक पाहणीच्या अॅपनुसार सर्व्हे : खरीप हंगामापासून सुरुवात

राज्य शासनाच्या ई-पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र शासनाने 'डिजिटल क्रॉप अॅप' तयार केले असून या अॅपच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील ३४ तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेल्या पिकांची नोंदणी या अॅपद्वारे होणार आहे. दरम्यान, भूमिअभिलेख विभागाने खरीप हंगामातील पिकांची नोंदणी अॅपच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली आहे.

राज्य शासनाने २०२१ सालापासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतात उभा असलेल्या पिकांची नोंदणी करण्यासाठी 'ई-पीक पाहणी' हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये असलेल्या पिकांची नोंद करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. या नोंदणीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शासनच्या वतीने देण्यासाठी उपयोग होणार आहे. राज्याने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी'च्या धर्तीवर केंद्राने डिजिटल क्रॉप अॅप तयार केले आहे. देशातील १३ राज्यांमध्ये याचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यातही ३४ तालुक्यांत याचा वापर करण्यास सुरुवात होणार आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी एक सहाय्यक नियुक्त करण्यात आलेला आहे. तसेच कोतवाल, पोलिस पाटील, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यापैकी एकाची नियुक्ती सर्व्हे करण्यासाठी केली असून, ही नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्वात छोट्या तालुक्यांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.


ई-पीक पाहणी करण्यात येणारे राज्यातील असे आहेत तालुके

वरूड (अमरावती), पातूर (अकोला), बुलढाणा (बुलढाणा), दिग्रस (यवतमाळ), फुलब्री (छत्रपती संभाजीनगर), रिसोड (वाशिम), लोहारा (धाराशिव), बदनापूर (जालना), मुदखेड (नांदेड), सोनपेठ (परभणी), वडवणी (बीड), जळकोट (लातूर), औंढा नागनाथ (हिंगोली), अंबरनाथ (ठाणे), तलासरी (पालघर), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), तळा (रायगड), लांजा (रत्नागिरी), काटोल (नागपूर), देसाईगंज, वाडसा (गडचिरोली), आमगाव (गोंदिया), सिंदेवाही (चंद्रपूर), साकोली (भंडारा), कारंजा (घा) (वर्धा), देवळा (नाशिक), श्रीरामपूर (नगर), शिंदेखेडा (धुळे), नंदुरबार (तळोदा), दौंड (पुणे), गगनबावडा (कोल्हापूर), पलूस (सांगली), खंडाळा (सातारा), दक्षिण सोलापूर (सोलापूर).


राज्यातील २ हजार ८५८ गावांना होणार लाभ
यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यातील ३४ तालुक्यांतील २ हजार ८५८ गावांमध्ये डिजिटल क्रॉप अॅपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करता येणार आहे.

• मागील वर्षीच्या खरीप हंगामातच डिजिटल क्रॉप अॅपवर नोंदणी करण्यास केंद्र शासनाने सांगितले होते. मात्र, त्या वेळी या प्रकल्पावर काम सुरू होऊ शकले नाही. परंतु, यंदाच्या खरीप हंगामात काम सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत.